राजगुरूनगर येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा : खेडचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार
राजगुरूनगर – जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात योग्य त्या जागेत विमानतळ करणारच, असा संकल्प करीत येत्या अर्थसंकल्पात 500 कोटीची तरतूद केली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजगुरूनगर येथे दिले.
खेड तालुक्याच्या आमदारपदी निवड झाल्याबद्दल आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा व पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल निर्मला पानसरे यांचा जाहीर नागरी सत्कार व शेतकरी मेळाव्याचे राजगुरूनगर येथे खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्यावतीने बुधवारी (दि. 19) आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालक मंत्री अजित पवार बोलत होते.
यावेळी जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, महिला अध्यक्षा संध्या जाधव, युवक अध्यक्ष कैलास लिंभोरे, बाजार समितीचे सभापती बाळशेठ ठाकूर, रामदास ठाकूर, डी. डी. भोसले, प्रतीक मोहिते, सुरेश शिंदे, अरुण चांभारे, बाबा राक्षे, ऍड. सुखदेव पानसरे, ऍड. अरुण मुळूक यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध गावातील सरपंच, उपसरपंच सहकारी संस्थांचे पदाधिकारी, शासकीय अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, खेड तालुक्यातील सर्व प्रश्न सोवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न असतील विशेषतः खेड तालुक्यात एमआयडीसीमध्ये स्थानिक कामगारांचा प्रश्न सोडविण्याकडे भर दिला जाईल, यासाठी उद्योगपती व स्थानिकांचे प्रश्न समजावून घेऊन यांच्यात मध्य साधला जाईल.
खेड तालुक्याच्या वैभवात भर घालणाऱ्या हुतात्मा राजगुरू राष्ट्रीय जन्मस्थळ स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही. या कार्यक्रमात अनेक पदाधिकाऱ्यांचे प्रवेश व विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौराव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर यांनी तर सूत्रसंचालन सुनील थिगळे यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माझ्यावर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी टाकली ती मी यशस्वीरित्या पार पडेल. जिल्ह्यासह खेड तालुक्याला जास्तीचा निधी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. जिल्हा परिषदेच्या अनेक योजना समाजातील तळागाळापर्यंत पोहोचवल्या जातील. जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न व जिल्हा नियोजन समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विविध विकासकामांना प्राधान्य दिले जाईल.
-निर्मला पानसरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे
मंत्रिमंडळात मला स्थान मिळावेही माझी इच्छा नव्हती. आहे त्या ठिकाणी समाधानी आहे. मी मागील पाच वर्षांत विरोधकांना विरोध केला नाही; मात्र आता ते मला विरोध करीत आहेत. तालुक्यातील अनेक प्रलंबित कामे यावेळी मार्गी लावली जातील ती होत असताना स्थानिक नागरिकांनी ती दर्जेदार कशी होतील याकडे लक्ष द्यावे. तालुक्यातील धरणाच्या पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केले जाणार आहे.
– दिलीप मोहिते, आमदार
संत तुकाराम कारखाना खेडमध्ये हलवणार
खेड तालुक्यातील उसाचे क्षेत्र लक्षात घेता आणि संत तुकाराम साखर कारखाना असलेल्या ठिकाणच्या आवश्यक बाबी लक्षात घेता लवकरच हा साखर कारखाना खेड तालुक्यात उपलब्ध जागेत हलवला जाईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खेड तालुक्यातील शेतकऱ्यांना दिला आहे.