नगर – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील प्रश्नपत्रिकेत 11 प्रश्न चुकीचे निघाले. त्यावर विद्यार्थ्यांसह पालकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
कामात हालगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पालकांमधून होत आहे. मात्र चार दिवसानंतरही परीक्षा परिषदेकडून याबाबत कोणताच खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे या अकरा प्रश्नाबाबत परीक्षा परिषद काय भूमिका घेणार याबत संभ्रम आहे.
पाचवी व आठवीची परीक्षा रविवारी जिल्ह्यातील 338 केंद्रांवर घेण्यात आली. पाचवीचे 33 हजार 995, तर आठवीचे 21 हजार 491, असे 55 हजार 486 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत भाषा व गणिताच्या पेपर झाला. या पेपरला पाचवीच्या 33 हजार 995 विद्यार्थ्यांपैकी 32 हजार 728 विद्यार्थी उपस्थित होते. यामध्ये भाषा व गणिताच्या पेपरमध्ये एकूण 11 प्रश्न चुकीचे आढळून आले.