मुंबई – राज्यातील विद्यापीठस्तरावरील अंतिम सत्राच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी घरी बसून देण्यास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिली आहे, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षा होतील, तर महिना अखेरपर्यंत निकाल जाहीर करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यपाल आणि कुलगुरुंसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
उदय सामंत म्हणाले, उद्या 12 वाजता अंतिम अहवाल सादर केला जाणार आहे. घरात बसून परीक्षा झाली पाहिजे यासाठी आमचा आग्रह होता. त्याला राज्यपालांनी मंजुरी दिली आहे. परीक्षा घेण्यासंबंधी ऑनलाइन, ऑफलाइन असे चार प्रकार असून त्यासंबंधी अंतिम अहवाल आज रात्रीपर्यंत तयार होईल. उद्या शासनाला तो प्राप्त होईल. अहवाल मिळाल्यांतर कोणतीही मुदत न घेता तातडीने विद्यापीठांकडे पाठवू, असे त्यांनी सांगितले.
सोमवारी किंवा मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक बोलावून युजीसीला विनंती करण्याबाबत निर्णय घेऊ. 31 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निकाल लावू शकतो ही जी कुलगुरुंनी भूमिका घेतली आहे ती आम्ही युजीसीकडे मांडू, असे सामंत म्हणाले.
परीक्षा सोप्या पद्धतीने
15 ते 30 सप्टेंबर दरम्यान प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. प्रॅक्टिकल परीक्षा सोप्या पद्धतीने घेतल्या जातील. यासंबंधी कुलगुरु निर्णय घेत आहेत. प्रॅक्टिकल परीक्षादेखील विद्यार्थ्यांना केंद्रावर न येता देता यावी यासाठी प्रयत्न असून तसाच अहवाल तयार करण्यात आला आहे. परीक्षेच्या तारखा संबंधित विद्यापीठं अंतिम करणार आहेत. तर युजीसीकडे अहवाल दिल्यानंतर 31 ऑक्टोबपर्यंत निकाल लागण्याचं बंधन विद्यापीठांवर असणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.