बचावकार्यात माणुसकीच्या हातांची मदत
इंदापूर/भिगवण – म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथील विहिरीची रिंग तयार करत असताना मातीचा ढिगारा ढासळून त्याखाली गाडले गेलेल्या 4 मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात एन डी आर एफ पथकाला 70 तासांनंतर यश मिळाले. 70 तास उलटून गेल्यामुळे मातीच्या ढिगाऱ्याखाली जिवंत मजूर मिळण्याची आशा मावळली होती आणि प्रत्यक्षात तेच वास्तव समोर आले. मृतदेह बाहेर काढताच मृतांच्या नातेवाइकांनी न्याय मिळाल्याशिवाय मृतदेह हलवू देणार नसल्याचे प्रशासनाला सांगितले.
शुक्रवारी (दि. 4) दुपारी दोन वाजून पन्नास मिनिटांच्या आसपास मजूर सोमनाथ गायकवाड (वय 31), जावेद मुलाणी (वय 30), परशुराम चव्हाण (वय 30), मनोज सावंत (वय 40) या चार मजुरांना मृतावस्थेत बाहेर काढण्यात यश आले. या बचाव कार्यासाठी तब्बल सात पोकलेन, दोन हायवा डंपर, दोन हायड्रा मशीन, छोटे पोकलेन, तर कित्येक जेसीबी परिसरातील उद्योजकांनी मानवतेच्या दृष्टिकोनाने या बचाव कार्यासाठी पुरवलो. एक दोन तास नव्हे तर तब्बल 70 तास माती, मुरमाखाली अडकलेल्या मजुरांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू राहिले. इतक्या अथक परिश्रमानंतर मजूर हाती लागले मात्र ते मृत्युमुखी अवस्थेत सापडले.
सकाळी गर्दी हटवण्यात आली. लोकांना दूर जाण्यास सांगितले, आपत्कालीन काम करणाऱ्या पथकाने शेवटच्या टप्प्यातील दगड माती काढण्याचे काम वेगाने सुरू झाले. विहिरीच्या लगत रुग्णवाहिका उभा करण्यात आल्या. या शेत जमिनीच्या मालकाने चौकोनी पद्धतीची दगडी खाण केली होती. त्यामुळे विहिरीत मातीखाली गाडलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी अत्यंत अडचणी येत होत्या. पोलीस यंत्रणा महसूल विभाग यांचे टीमवर्क झाल्यामुळे अडचणीच्या प्रसंगात देखील शोध कार्य यशस्वी झाले. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एका कामगाराचा मृतदेह मिळून आला. त्यानंतर शोधकार्य सुरु ठेवून 3 मजुरांचे मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. 127 फूट खोल विहिरीतून हे मृतदेह बाहेर काढण्यात आले. विहिरीची अर्धवट असलेली रिंग तोडून माती हटवण्यात आली.
कारवाई कोणावर होणार
जे चार मजूर आपल्या पोटासाठी विहिरीवर काम करण्यासाठी गेले होते. ती विहीर त्या शेतकऱ्याने शासनाचे नियम पायदळी तुडवून, कशी इतकी खोल विहीर खोदली. महसूल विभागाला आजपर्यंत या बेकायदेशीर गोष्टीचा कसा सुगावा लागला नाही. ज्या इंदापूर तालुक्यात बेकायदेशीर खाणी आहेत. अशा दगडाच्या खाणी चालवण्यासाठी जे महसूल विभागाचे मंडल अधिकारी, छुप्या पद्धतीने मोठी मदत करतात. तर जे गावकामगार तलाठी, यांनी कोणतीही ऍक्शन अशा खाणमालकांवर घेतलेली नव्हती. अशा सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबन शासन करणार का? असाही सवाल सुज्ञ नागरिक करत आहेत.
माणुसकीच्या हाताने केली मोठी मदत
इंदापूर तालुक्यात आजपर्यंतच्या इतिहासात इतकी भयाण दुर्दैवी घटना मनाला वेदना देणारी कोठेही घडली नव्हती; मात्र चार मजूर मातीखाली गाडले गेले ही बातमी वाऱ्यासारखी तालुकाभर पसरली. आमदार दत्तात्रय भरणे तर पहाटेच्या प्रहरातच मुंबई येथे अधिवेशन असताना, हे मजूर सुखरूप कसे बाहेर येतील. यासाठी मोठी धडपड करत घटनास्थळी थांबले. मानवतेच्या दृष्टिकोनातून देसाई परिवार व भरणे परिवार यांनी या बचाव कार्यात मदत केल्याने संकटाच्या वेळी, माणुसकीचे हात इंदापूर तालुक्यात मदतीला येतात याचा प्रत्यय सर्वांना आला.