नीरा खोऱ्यातील धरणे “पाणीदार’ ; आवर्तनाचा प्रश्न निकालात
नीरा – नीरा नदीच्या खोऱ्यामध्ये मागील काही काळापासून पडत असलेल्या पावसामुळे या खोऱ्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. नीरा नदीच्या खोऱ्यात असलेल्या वीर, भाटघर, नीरा देवघर आणि गुंजवणी या धरणांचा एकूण पाणी साठा 82 टक्क्यांहून जास्त झाला आहे. गेल्यावर्षी याचदिवशी हा पाणीसाठा कमी होता. पाणीसाठा वाढल्याने नीरा डावा कालवा आणि उजवा कालवाच्या लाभक्षेत्रात असलेल्या शेतीला याचा मोठा फायदा होणार आहे.
पुणे जिल्ह्यात मात्र बेताचाच पाऊस झाला आहे. त्यातही पुरंदर आणि भोर तालुक्यात पावसाचे प्रमाण नेहमीपेक्षा कमीच आहे. भोरमध्ये काही प्रमाणात पाऊस असल्याने भोर आणि वेल्हा तालुक्यातील धरणांमध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे. पुरंदर आणि खंडाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या वीर धरणात चांगला पाणीसाठा झाला आहे.
(दि.4) सकाळी या धरणांचा एकूण पाणीसाठा 82 टक्के झाला आहे. त्यामुळे कालवाच्या लाभक्षेत्रात मोठा फायदा होणार आहे. शुक्रवारी सायंकाळी, वेल्ह्यातील गुंजवणी धरण 74.1 टक्के भरले आहे. भोरमधील भाटघर धरण 76.30 टक्के भरले आहे. या धरणांमध्ये 17 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
नीरा देवघर धरण 94 टक्के भरले आहे. यामध्ये 11 टीएमसी पाणीसाठा, वीर धरण 85.55 टक्के भरले आहे. या धरणांत 8 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. तर गुंजवणी धरणात 2.731 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.
नीरा नदीत विसर्गाची प्रतीक्षा
चारही धरणांत एकूण 39.79 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी आजच्या दिवशी सर्व धरणात मिळून 37.584 टीएमसी पाणीसाठा झाला होता.मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी वीर धरणातून नीरा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले होते. मात्र यावर्षी नीरा नदी पात्रात अद्याप पाणी सोडले नाही. त्यामुळे नदीकाठच्या लोकांना नदीपात्रात केव्हा पाणी येणार, याची प्रतीक्षा आहे.