अनेकांनी ‘सुसाइट नोट’ सोडली नसल्याने गूढ
– संजय कडू
पुणे – लॉकडाऊन शिथिल होताच शहरात आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. यातील बहुतांश जणांनी “सुसाइट नोट’ सोडलेली नाही. तर, आत्महत्येमागे कोणतेच कारण नसल्याचे काहींच्या कुटुंबीयांनीही स्पष्ट केले आहे. यामुळे अनेक आत्महत्यांचे गूढ पोलिसांना सोडवता आले नाही. मात्र, मानसशास्त्रज्ञांनी आत्महत्यांचा उलगडा केला आहे. या घटनांमागे “तो एक क्षण’ कारणीभूत असल्याचे पुढे आले असून लॉकडाऊनमुळे ‘तो क्षण’ उद्भवल्याचेही स्पष्ट झाले आहे.
आत्महत्या आणि लॉकडाऊन
लॉकडाऊनमुळे अनेकांचे कर्जाचे हप्ते थकले. उत्पन्न घटले, पण दैनंदिन खर्च सुरूच आहे. अनेकांच्या वेतनात कपात झाली आहे. नोकरीची हमी राहिली नाही. नोकरीतील असुरक्षितता आणि अस्थिरता वाढली आहे. यामुळे मानसिक पोकळी निर्माण होऊन व्यक्ती मानसिकदृष्ट्या कमजोर झाला आहे. या सर्व विचारांत त्याच्या मनावरील तणाव वाढला आहे. रात्रभर झोप येत नाही. याचा परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे. हेही एक आत्महत्यांमागे महत्त्वाचे कारण असल्याची माहिती मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संकल्प निर्मल यांनी दिली.
काय आहे ‘तो क्षण’
प्रत्येकाच्या आयुष्यात ताणतणाव असतो. मात्र, दैनंदिन व्यस्ततेमुळे त्याकडे लक्ष दिले जात नाही. छोट्या-मोठ्या समस्यांवर विचार करायलाही अनेकांना वेळ नसतो. मात्र, लॉकडाऊनमुळे अनेकांना सलग काही महिने घरी बसावे लागले. यामुळे समस्यांवर विचार करायला भरपूर वेळ मिळाला. यातच नोकरी-व्यवसायातील असुरक्षितता, नाते-संबंधातील दुरावा, भविष्यातील विचार, लॉकडाऊननंतरच्या परिस्थिीचा अंदाज यामुळे मनावरचा ताण वाढला. यामुळे अनेकांमध्ये एक सुप्त नैराश्य येत आहे.
यामध्ये एक असा क्षण येतो, की आत्महत्या करावीशी वाटते. त्या क्षणावर नियंत्रण न ठेवता कृती केली, तर आत्महत्या होऊन जाते. यामुळे तो सुप्त क्षण जाणवताच त्यावर कोणतीही कृती टाळली पाहिजे. त्यातून स्वत:ला सावरले पाहिजे. जे स्वत:ला यातून बाहेर काढू शकले नाहीत, त्यांनी आत्महत्या केल्या आहेत. या आत्महत्या पूर्वनियोजित नसल्याने सुसाइड नोट मागे ठेवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे काही निष्कर्ष समोर येत आहेत.
वाढत्या आत्महत्यांमागे कारण : मानसशास्त्रज्ञांचा निष्कर्ष
लॉकडाऊनमध्ये विचार करायला भरपूर वेळ मिळाला. यामुळे त्यांच्या मनातील आजवर दबलेले सुप्त नैराश्य समोर आले. याच्यावर नियंत्रण न ठेवले गेल्याने आत्महत्यांच्या घटना वाढल्या आहेत.
– डॉ. संकल्प निर्मल, मानसोपचारतज्ज्ञ
लॉकडाऊनमुळे नेहमीची जीवनशैली मोडली गेली. एकटेपणा वाढत जाऊन नोकरी-व्यवसायातील अस्थिरता समोर आली. यामुळे जे जास्त संवेदनशील आणि अंतर्मुख होते ते स्वत:शीच विचार करायला लागले. त्यांच्या मनात “आत्मघात’ हळूहळू रुजत गेला. यातूनच आत्महत्येचे सत्र सुरू झाले आहे.
– डॉ. शरद आखेगावकर, वरिष्ठ मानसोपचारतज्ज्ञ
एकट्या सिंहगड पोलीस ठाणे हद्दीत एक ते दीड महिन्यात जवळपास 12 आत्महत्या झाल्या आहेत. यातील फक्त एका व्यक्तीनेच सुसाइड नोट लिहून आत्महत्या केली. इतरांच्या आत्महत्यांची कारणे नातेवाईक आणि मित्र मंडळींशी बोलून शोधली जात आहेत.
– नंदकुमार शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस ठाणे