नगर – राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या 12 जागांच्या नियुक्तीला होणाऱ्या दिरंगाईवरून शिवसेना नेते राऊत यांनी पुन्हा राज्यपालांना लक्ष्य केले. तसेच ही परिस्थिती राजकारणातील नवी आणीबाणी असल्याचा आरोप केला. यावर आज राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले.
रोहित पवार म्हणाले कि, संजय राऊत हे भाजपला फार जवळून ओळखतात. भाजप सातत्याने सत्तेत कसे येतील याचेच प्रयत्न करत असतात. कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेशसारख्या राज्यांमध्ये भाजपने काहीन काही करून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला. संजय राऊतांचे म्हणणे असेल कि भाजपची विचारसरणी पाहता ते खूप दिवस सत्तेच्या बाहेर राहू शकत नाही. पण राऊत यांनी त्या प्रयत्नांना यश मिळेल असे म्हणाले नाही. महाविकास आघाडीत अनुभवी नेते असून सरकारवर लोकांचा विश्वास आहे. सध्या आर्थिक परिस्थिती बिकट असूनही लोकांच्या हिताचे निर्णय घेत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त 12 जागा भरायच्या आहेत. या 12 जागांचे राजकारण आताच सुरू झाले आहे. सरकारने शिफारस केलेले 12 सदस्य विधान परिषदेत जाऊ नयेत असे विरोधी पक्षाला वाटत आहे, असे संजय राऊत म्हणाले होते.