जामखेड – अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त सकाळी सात वाजता अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मभूमीतून आलेला गजराज, घोडे, तसेच टाळकरी यांच्या समवेत ग्रामस्थांसह दि. 31 मे रोजी सकाळी चौंडीत यात्रा काढणारच, असा आक्रमक पवित्रा आमदार रोहित पवार यांनी घेतला आहे. जरी परवानगी दिली नाही, किंवा गुन्हे दाखल केले तरी यात्रा काढण्याचा निर्धार ग्रामस्थ, वंशज व आ. रोहित पवार यांनी केल्याने याहीवर्षी सत्ताधारी व विरोधक यांच्यात पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त येत्या 31 मे रोजी चौंडी (ता.जामखेड) येथे होणाऱ्या कार्यक्रमास मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. यामुळे आमदार पवार यांच्या कार्यक्रमाला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तरीही ग्रामस्थ व ग्रामपंचायतीच्या यात्रेत सहभागी होणारच आहे. आमचा शासकीय कार्यक्रमाला पाठिंबा आहे. त्यामुळे प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येण्याअगोदर आमचा कार्यक्रम संपेल, असे आमदार पवार यांनी चौंडीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी कर्जत-जामखेड विधानसभा प्रमुख प्रा. मधुकर राळेभात, राजेंद्र कोठारी, सुरेश भोसले, अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज अक्षय शिंदे, माजी सभापती सुधीर राळेभात, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट, प्रकाश सदाफुले, सरपंच सुनील उबाळे, नगरसेवक दिगंबर चव्हाण यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कर्मभूमीतून जन्मभूमीत गजराज आणले आहेत. याचबरोबर घोडे, टाळकरी, वारकरी व ग्रामस्थांसमवेत यात्रा काढत महादेव मंदिरात दर्शन घेत अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकासमोर नतमस्तक होणार आहेत. यात अनेक धार्मिक कार्यक्रम राहतील, नंतर सर्वांना महाप्रसाद दिला जाईल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येण्याच्या अगोदर आमचा कार्यक्रम संपेल, तरी प्रशासनाने आम्हाला परवानगी द्यावी, अशी मागणी आ. पवारांनी केली.
या यात्रेत उज्जैन येथून आणलेला गजराज (हत्ती), घोडे, वारकरी, टाळकरी यांचाही समावेश असणार आहे. सकाळी 7 वाजता यात्रा निघेल व मंदिरापर्यंत येईल. दि. 31 मे रोजी होणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या शासकीय कार्यक्रमास आमचा पाठिंबाच आहे. या कार्यक्रमासाठी येत असलेले मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री येण्यापूर्वीच आम्ही आमचे कार्यक्रम संपवणार आहोत. मात्र, आम्ही घेत असलेल्या कार्यक्रमांना जरी प्रशासनाने परवानगी दिली नाही तरी आम्ही 100 टक्के शांततेच्या मार्गाने ग्रामस्थांच्या वतीने चालत आलेली यात्रा काढणार आहोत, असा निर्धार आ. पवार यांनी व्यक्त केला.
आमदार रोहित पवार यांच्या यात्रेला प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. तरीही दरवर्षीप्रमाणे यात्रा काढणारच, असा निश्चय केला आहे. यामुळे याहीवर्षी सत्ताधारी व विरोधक यांच्यात पुन्हा संघर्ष होण्याची चिन्हे दिसू लागले आहेत.