डॉ. राजू गुरव पुणे, दि. 11 -शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) अपात्र ठरल्यानंतरही पात्रतेचे प्रमाणपत्र मिळवून शाळांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांचा शिक्षक संचालकांनी शोध सुरू केला आहे. या शिक्षकांचे शालार्थ आयडी गोठवून त्यांचे वेतन रोखले जाणार आहे. त्यानंतर त्यांची सेवा समाप्त करुन त्यांची हकालपट्टी करण्यात येणार आहे.
दि 19 जानेवारी 2020 रोजी घेण्यात आलेल्या “टीईटी’ परीक्षेत 16 हजार 705 उमेदवार उत्तीर्ण झाले होते. काही अधिकारी, कर्मचारी, एजंट, परीक्षा घेणाऱ्या खासगी कंपनीचे संचालक, मंत्रालयातील बडे अधिकारी यांनी लाखो रुपयांची “उलाढाल’ करुन नापास उमेदवारांना पास केले. पुणे पोलिसांच्या चौकशीत या प्रकाराचा पर्दाफाश झाला. यात पैसे देऊन पास झालेल्या 7 हजार 874 उमेदवारांची यादी पोलिसांनी शिक्षण विभागाला सादर केली होती.
शालेय शिक्षण विभागाचे कक्ष अधिकारी वैभव डुंबरे यांनी दोषी उमेदवारांवर कारवाई करण्यासंदर्भात 10 जून रोजी आदेश दिले. परीक्षा परिषदेला हे आदेश 24 जूनला मिळाले. त्यानंतर परिषदेने विलंबाने म्हणजेच 3 ऑगस्ट रोजी कारवाई निश्चित करुन संबंधित उमेदवारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केली. उमेदवारांची “टीईटी’ची प्रमाणपत्रे रद्द करण्याबरोबर त्यांना “टीईटी’ परीक्षेला बसण्यास कायमस्वरूपी प्रतिबंध घातला आहे.
दरम्यान, या गैरव्यवहारातील काही उमेदवार शिक्षक म्हणून विविध ठिकाणच्या शाळांमध्ये कार्यरत असून, त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेशही शासनाने शिक्षण संचालकांना दिले आहेत. यानुसार प्राथमिक शिक्षण संचालनालयाने कारवाई सुरू केली आहे. संबंधित घोटाळेबाज शिक्षक कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या शाळेत कार्यरत आहेत याचा ऑनलाइन यंत्रणेमार्फत शोध सुरू केला आहे.