मुख्यमंत्र्यांकडे शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड ही कष्टकऱ्यांची नगरी आहे. शहरात उपजिवेकेसाठी आलेल्या गोरगरीब नागरिकांनी कष्टाच्या पैशांतून घरे बांधली आहेत. त्या घरांना भरमसाठ शास्तीकराची आकारणी केली जात आहे. नागरिकांना हा दंड परवडणारा नसून मालमत्ता थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. भाजप सरकारने सरसकट शास्तीकर माफीचे आश्वासन पाळले नाही. परंतु, आता शिवसेनाप्रणित महाविकास आघाडी सरकारकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. त्यामुळे शहरातील निवासी अवैध बांधकामांचा शास्तीकर मार्च महिन्यापूर्वी रद्द करावा, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना समक्ष भेटून कलाटे यांनी ही मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना कलाटे यांनी निवेदन दिले असून निवेदनात म्हटले आहे की, शहरात सध्या पाच लाख 24 हजार मालमत्ता आहेत. त्यापैकी चार लाख 45 हजार निवासी मालमत्ता आहेत.
तर, 45 हजार 800 मालमत्ता बिगरनिवासी, 3700 औद्योगिक मालमत्ता आहेत. याशिवाय आठ हजार 700 मोकळ्या जागा असून चार हजार 900 इतर मालमत्ता आहेत. महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात 86 हजार मालमत्ता या अनधिकृत असल्याची नोंद आहे. प्रत्यक्षात मात्र दोन लाखांवर अवैध बांधकामे आहेत.
तत्कालीन भाजप सरकारने शास्तीकरमाफीचा अर्धवट आणि फसवा निर्णय घेतला. शंभर टक्के शास्ती माफीचे आश्वासन पाळले नाही. केवळ एक हजार चौरस फुटापर्यंतच्या बांधकामांचा शास्तीकर माफ केला.