हैदराबाद – तेलंगणात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून राज्य आणि केंद्राच्या अंमलबजावणी यंत्रणांनी कारवाई करत आतापर्यत तब्बल 603 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी करण्यात आलेल्या छापेमारीत 214 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय 179 कोटी रुपयांचे सोने आणि मौल्यवान वस्तू, 96 कोटी रुपयांची दारू, 34 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे अंमली पदार्थ आणि 78 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्यापासून 1950 या हेल्पलाइनवर 1,987 कॉल आले. तसेच एनजीआरएसकडे एकूण 20,670 तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी 20,301 तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
मध्य प्रदेशात 339 कोटींचा मुद्देमाल जप्त –
मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून 40.18 कोटी रुपयांची रोकड, 17 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ, मद्य, दागिने आणि एकूण 280 कोटी रुपयांच्या इतर वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.
राज्यातील 230 विधानसभा जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अनुपम राजन म्हणाले की, निवडणूक वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली तेव्हापासून राज्यभर अंमलबजावणी यंत्रणांकडून सातत्याने कारवाई करण्यात आली.
बेकायदेशीर दारू, अंमली पदार्थ, रोख रक्कम, मौल्यवान धातू, सोने, चांदी, दागिने आणि सुमारे 339.95 कोटी रुपयांचे इतर साहित्य फ्लाइंग सर्व्हेलन्स टीम, स्टॅटिक सर्व्हिलन्स टीम आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने जप्त केले आहे, असे ते म्हणाले.