मुंबई – आयपीएल स्पर्धेत सातत्याने सरस कामगिरी केलेल्या दिनेश कार्तिकला भारतीय संघात पुनरागमनाची संधी दिली जाते. मात्र, त्याला प्रत्यक्ष सामन्यांत सातत्याने खेळवले जात नाही. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा व संघ व्यवस्थापनाचा त्याच्यावर विश्वासच नसल्याचे स्पष्ट होते, अशा शब्दांत समालोचक व माजी कसोटीपटू आकाश चोप्रासह अनेकांनी निवड समिती तसेच संघ व्यवस्थापनावर टीका केली आहे.
यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कार्तिकने अफलातून कामगिरी केली. त्याने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीप्रमाणे बेस्ट फिनिशरची भूमिकाही पार पाडली. त्याच्या याच कामगिरीच्या जोरावर त्याला भारतीय संघात पुनरागमन करण्याची संधीही मिळाली. मात्र, त्याला एखाद्या सामन्यात खेळवले जाते व लगेचच ऋषभ पंतलाच सातत्याने संधी दिली जाते. याचाच अर्थ वारंवार अपयशी ठरूनही पंतवर जितका विश्वास दाखवला जातो तेवढा कार्तिकवर दाखवला जात नाही, अशी चर्चा समालोचकांमध्ये रंगली होती.
खेळाडू की पर्यटक
भारतीय संघात गेल्या वर्षीपर्यंत कार्तिकला संधीच मिळत नव्हती. मात्र, त्याने स्वतःच्या कामगिरीच्या जोरावर निवड समितीला प्रभावित केले व संघात पुनरागमन केले. आशिया करंडक स्पर्धेत पंतलाच खेळवले गेले तसेच होत राहिले तर तो संघाचा खेळाडू आहे की पर्यटक असाच प्रश्न निर्माण होणार आहे.
सोमवारी बीसीसीआयने टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात स्थान दिले आहे. मात्र, आशिया करंडकात जे घडले त्याचीच पुनरावृत्ती घडली तर त्याच्या निवडीला अर्थच राहणार नाही. आशिया करंडक स्पर्धेत कार्तिकला केवळ एकाच सामन्यात खेळवले गेले. या स्पर्धेत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याला खेळवले गेले व त्यात त्याच्या वाट्याला केवळ एकच चेंडू आला. त्यानंतर संघातून वगळले व पंतला अंतिम संघात स्थान दिले गेले. असेच जर घडणार असेल तर त्याला संघात निवडण्याचे कारणच काय, असा प्रश्नही यावेळी विचारला गेला.