डर्बिशायर – स्टार फलंदाज स्मृती मानधनाची अफलातून खेळी व गोलंदाजांनी केलेल्या अचूक कामगिरीच्या जोरावर भारताच्या महिला संघाने यजमान इंग्लंड महिला संघाचा 8 गडी राखून पराभव करत दुसरा टी-20 सामना जिंकला व तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. आता गुरूवारी(दि.15) तिसरा व निर्णायक सामना होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना यजमान संघाने जिंकत आघाडी घेतली होती.
.@mandhana_smriti bags the Player of the Match award for a terrific unbeaten 7⃣9⃣-run knock as #TeamIndia beat England in the 2nd T20I to level the series. 👏👏
It all comes down to the decider to be played on Thursday. 👊
Scorecard ▶️ https://t.co/Xvs9EDrb2y #ENGvIND pic.twitter.com/WTwA7nXshP
— BCCI Women (@BCCIWomen) September 13, 2022
इंग्लंडने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकांत 6 गडी गमावून 142 धावा केल्या. त्यांच्या फ्रेया केम्पने 51 धावांची खेळी केली. माइया बाउशियरने 34 धावा केल्या. भारताकडून स्नेह राणाने सर्वाधिक 3 गडी बाद केले, तर रेणुका सिंग व दीप्ती शर्माने प्रत्येकी 1 बळी घेतला.
विजयासाठी 143 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात थाटात झाली. सलामीवीर शफाली वर्मा 20 धावा करून बाद झाली. मात्र, तोपर्यंत संघाचे अर्धशतक फलकावर लागले होते. पाठोपाठ दयालन हेमलता अपयशी ठरली. मात्र, त्यानंतर सलामीवीर स्मृती मानधनाने कर्णधार हरमनप्रीत कौरसह सुरेख फलंदाजी केली. या जोडीने तिसऱ्या गड्यासाठी 74 धावांची अभेद्य भागीदारी करत संघाचा विजय साकार केला.
मानधनाने नाबाद 79 धावांची खेळी करताना 53 चेंडूत 13 चौकार फटकावले. कर्णधार हरमनप्रीतने 22 चेंडूंचा सामना करताना 4 चौकारांसह नाबाद 29 धावा केल्या. भारताने हे आव्हान 16.4 षटकांत 2 गडी गमावून पूर्ण करत सामना जिंकला व मालिकेतही बरोबरी केली.