ढाका – महिलांच्या आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताच्या महिला संघाने उपांत्य फेरीत थायलंडचा 74 धावांनी पराभव केला. (Team India beat Thailand by 74 runs) या विजयासह भारतीय संघाने अंतिम फेरीत थाटात प्रवेश केला असून आता विजेतेपदासाठी त्यांचा सामना श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेने दुसऱ्या उपांत्य लढतीत बलाढ्य पाकिस्तानचा अवघ्या 1 धावेने पराभव केला.
थायलंडने नाणेफेक जिंकत भारताला पहिल्यांदा फलंदाजी दिली. सलामीवीर शफाली वर्माने 42, कर्णधार हरमनप्रीत कौरने 36 तर जेमिमा रॉड्रीक्सने 27 धावांची खेळी केली. तळात पूजा वस्त्रकारने चमक दाखवताना 17 धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाला 20 षटकांत 6 बाद 148 धावांपर्यंत मजल मारता आली. स्टार फलंदाज स्मृती मानधना व रिचा घोष साफ अपयशी ठरल्या. थायलंडकडून सोरनारीन टीपोहने सर्वाधिक 3 गडी बाद केले.
4⃣2⃣ Runs
1⃣ Wicket
1⃣ Catch@TheShafaliVerma bags the Player of the Match as #TeamIndia beat Thailand. 👍 👍Scorecard ▶️ https://t.co/pmSDoClWJi #AsiaCup2022 | #INDvTHAI pic.twitter.com/Jidbc383eX
— BCCI Women (@BCCIWomen) October 13, 2022
भारताने थायलंडसमोर विजयासाठी 149 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, थायलंडला 20 षटकात 9 बाद 74 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून दीप्ती शर्माने 3 तर राजेश्वरी गायकवाडने 2 गडी बाद केले व संघाला 74 धावांनी सहज विजय प्राप्त करुन दिला.
श्रीलंकेशी रंगणार लढत
उपांत्य लढतीच्या अखेरपर्यंत रंगलेल्या सामन्यात श्रीलंका महिला संघाने बलाढ्य पाकिस्तानचा अवघ्या एका धावेने पराभव केला. श्रीलंकेचा डाव पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 बाद 122 धावांवर रोखला गेला. विजयासाठी जिद्दी पाठलाग केल्यावरही पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तानचा डाव 20 षटकांत 6 बाद 121 धावांवर रोखत श्रीलंकेने भारतीय संघाविरुद्ध अंतिम फेरी निश्चित केली. अंतिम लढत येत्या शनिवारी होणार आहे.
थायलंडच्या फलंदाजांना भारताच्या फिरकी गोलंदाजीचा सामनाच करता आला नाही. कर्णधार नुरुमोल चायवई व नात्या बोशथाम यांनी प्रत्येकी 21 धावांची खेळी केली. दीप्ती शर्मा व राजेश्वरी गायकवाड यांच्या गोलंदाजीसमोर त्यांच्या फलंदाजीची वाताहत झाली. या विजयासह भारताने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.
सलग आठव्यांदा अंतिम फेरीत धडक
भारतीय महिला संघाचा रेकॉर्ड कायम असून संघाने सलग आठव्यांदा आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. या स्पर्धेचा हा आठवा हंगाम असून भारतीय महिला संघ प्रत्येक वेळी विजेतेपदाच्या लढतीत पोहोचला आहे. मागील आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघास बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला होता. भारतीय महिला संघाने सहा वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावण्याची कामगिरी केली आहे.