पुणे – राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न महिन्याभरात सोडविणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली.
मुंबई येथे शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत बैठक झाली. यास आमदार डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, बाळाराम पाटील, सतीश चव्हाण, किरण सरनाईक, जयंत आसगावकर, कपिल पाटील, नागो गाणार, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर, राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, विद्या प्राधिकरणाचे संचालक एम. डी. सिंह, महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय शिंदे, सचिव प्रा. संतोष फाजगे, कार्याध्यक्ष प्रा. अविनाश तळेकर, समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर आदी उपस्थित होते.
वाढीव पदांना मान्यता देण्याबाबत येत्या पंधरा दिवसांत मंत्रिमंडळ बैठकीसमोर सर्व माहितीसह दाखल झालेल्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल. आयटी विषय शिक्षकांच्या मान्यतेसंदर्भात सर्व माहिती 30 एप्रिलपर्यंत मागवली आहे. तासिका तत्वावरील शिक्षकांचे मानधन वाढविण्यासंदर्भात पुढील आठवड्यात प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत.
निवड व वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण येत्या महिनाभरात ऑनलाइन पद्धतीने शिक्षकांना देण्यात येईल. शिक्षकांचे प्रलंबित शालार्थ आयडी त्वरित मिळावे आणि 31 मार्चपूर्वी त्यांना वेतन अदा करण्यात यावे, अशा सूचनाही अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
जुनी पेन्शन योजना…
अघोषित तुकड्या व कनिष्ठ महाविद्यालयांच्या अनुदानासंदर्भात सर्व माहिती मंत्रालयात प्राप्त झाली असून पुढील दोन आठवड्यांत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी सेवेत असलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी सहमती दर्शवली व 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्यांच्या बाबतीत पुढील बैठकीत चर्चा करण्यात येईल, असे सांगितले.