चळवळ्या स्वभाव आणि सतत नवीन शोधण्याची प्रवृत्ती यामुळे कांचनताईचा व्यवसायसुध्दा अगदी अपारंपरिक.
पारंपरिक चौकटीला छेद देत नवीन क्षितिज धुंडाळण्याचा हा प्रयत्न प्रचंड कौतुकास्पद आहे.
प्रवाहाच्या विरोधात जाण्याची आणि ईप्सित साध्य करण्याची तयारी असेल तर यश दूर नसते. चाकोरीत तर सगळेच जगतात. मात्र, चौकटीच्या पलीकडे जाऊन नवा आसमंत शोधण्याची वृत्ती फारच कमी लोकांमध्ये असते. शिवाजीनगर सातारा येथे राहणाऱ्या कांचन विकास कोळी हे असेच एक व्यक्तिमत्व आहे. चळवळ्या स्वभाव आणि सतत नवीन शोधण्याची प्रवृत्ती यामुळे कांचनताईचा व्यवसायसुध्दा अगदी अपारंपरिक. सेंद्रिय शेतीतला उत्पादित माल थेट ग्राहकापर्यंत ताज्या स्वरूपात पोहचवणे, यासाठी ग्रीन वेजीस ही फर्म सातारकरांच्या सेवेला सज्ज झाली आहे.
पारंपरिक चौकटीला छेद देत नवीन क्षितिज धुंडाळण्याचा हा प्रयत्न प्रचंड कौतुकास्पद आहे. कांचनताईंचा हा प्रयत्न इथेच थांबत नाही तर महाराष्ट्रीय संस्कृतीचा शोध आणि बोध,’ यावर त्यांचे सतत संशोधन सुरू असते. तिथेही त्यांनी नऊवारीची खानदानी परंपरा हेरली आणि हा अस्सल मराठमोळा पेहराव भाड्याने देण्याचा वेगळा मार्ग शोधून काढला. शिवजयंतीच्या मुहुर्तावर साताऱ्यात पाचशेहून अधिक महिलांचा रेकॉर्ड ब्रेक वॉकेथॉन झाला. या रेकॉर्ड ब्रेक हिरकणी ज्या पारंपरिक वेषात उभ्या राहिल्या ती वेषभूषा व स्त्री अलंकार कांचनताईंनी प्रायोजित केले होते. कांचन कोळी यांचा जन्म साताऱ्याचा. शाळा, महाविद्यालयीन शिक्षण साताऱ्याच्या कन्या शाळेतच झाले.
योगायोगाने 2006 मध्ये याच शाळेत कांचन विकास कोळी शिक्षिका म्हणून रुजू झाल्या. तत्पूर्वी पती विकास, चिरंजीव उत्कर्ष, कन्या आकांक्षा, घरगुती जवाबदाऱ्यांना पुरेपूर न्याय देण्याची कसरत, नोकरी आणि घर हा समन्वय साधण्याची धडपड करीत कांचनताई या जवाबदारीत कोठेही कमी पडल्या नाहीत. विकास कोळी हेसुध्दा शिक्षकी पेशातलेच. मात्र, दोघांमध्ये विश्वासाचा समन्वय आणि एकमेकांना समजून घेण्याची सवय यामुळे गेल्या पंधरा वर्षात कोळी दाम्पत्याचे सहजीवन प्रचंड आनंदाचे होते. उत्तम नोकरी, परिपूर्ण संसार, प्रचंड गणगोतं तरीही कांचनताईंना खुणावत होत ते व्यवसायाच नवीन क्षितिज. लग्नाच्या आधीसुध्दा त्यांनी छोटे मोठे व्यवसाय करून फार लहान वयात त्यांनी आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग शोधला होता. त्यामध्ये स्वतःची निर्णयक्षमता आणि धाडस आजमावण्याचा तो एक प्रयोग होता.
सेंद्रिय उत्पादने थेट सातारकरांच्या घरात पोहचवण्याची कल्पना त्यांनी पती विकास यांच्यासमोर मांडली आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाठीभेटी हा एककलमी कार्यक्रम कोळी दाम्पत्याने सुरु केला. सतत वाचन, संशोधन, बाजार समितीची उलाढाल, स्वतःची आर्थिक क्षमता याचे मापदंड जोखून विकास व कांचन या दाम्पत्याने “ग्रीन वेजीस’ ही फर्म साताऱ्यात सुरू केली. नोकरी करणाऱ्या महिलांना घर व नोकरी य दोन्हीकडे लक्ष देताना प्रचंड कसरत होते.
स्वयंपाकासाठी तर त्यांना स्वयंपाक करणाऱ्या ताईवर अवलंबून राहवे लागते. त्यावेळी भाजीपाला उपलब्ध करणे ही मोठी कसरत असते. आठवड्याची भाजी एकदम भरून ती आहारात घेईपर्यंत त्याचे सत्वं संपलेले असते. ही अडचणं ओळखून कांचनताई यांनी स्वच्छ व चिरलेली ताजी पालेभाजी थेट ग्राहकांपर्यंत पोहचवण्याची सेवा ग्रीन वेजीसफ च्या माध्यमातून सुरू केली. त्यासाठी बाजारातला “रिसर्च व ऍनॅलिसिस’ स्वतः कांचनताई करतात. विकासनगर, गोडोली, शाहूपुरी, कोडोली या भागांत ग्रीन वेजीस फर्मचा व्यवसाय हळूहळू विस्तारतो आहे.
ग्रीन वेजीसफची स्वतःची स्वतंत्र वितरण यंत्रणा आहे. ग्रीन वेजीसला इमर्जन्सी फोन करायचा आणि सत्वयुक्त भाजीचा पर्याय सोडवायचा यामुळे गृहिणींची “”ग्रीन वेजीस’ला पसंती मिळू लागली आहे. सातारा मराठा साम्राज्याची राजधानी. तिचा पारंपरिक साज आणि बाज खानदानी. यामध्ये नऊवारीचे सौंदर्य नेहमीच खुलून येते. ही नऊवारी भाड्याने देण्याचे कांचनताई यांचे नियोजन यशस्वी ठरले आहे. लग्नसराई, मुंज, बारसे इत्यादी पारंपरिक कार्यक्रमांना महिला हट्टाने नऊवारी साज परिधान करतात.
उत्तम दर्जाच्या व प्रिंटेड वेगवेगळ्या खणाच्या दर्जेदार नऊवारी व दागिन्यांचा साज या कांचनताई यांच्याकडे उपलब्ध आहे. साताऱ्यात नऊवारीचा साज व परंपरा ठेवण्याचे काम कांचनताई यांनी सुरू ठेवले आहे. त्यांना ही नवीन सुरवात वाटते. शिक्षिका ते उद्योजिका हा यशस्वी प्रवास त्यांनी सहजपणे केला आहे .