नवी दिल्ली- केंद्र सरकारने कर व्यवस्थेत विश्वास आधारित केलेल्या सुधारणामुळे करदात्यांचा केंद्र सरकारवरील विश्वास वाढला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून प्रत्यक्ष कर संकलनात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याची माहिती अर्थमंत्रण निर्मला सीतारामन यांनी दिली.
रविवारी 163 वा प्राप्तीकर दिवस पाळण्यात आला यावेळी सितारामन यांनी दिलेल्या संदेशात म्हटले आहे की, काही वर्षांमध्ये केवळ कर संकलनात वाढ झालेली नाही तर कर दात्यांची संख्याही वेगाने वाढत आहे. 2021-22 मध्ये प्रत्यक्ष कर संकलनातून सरकारला तब्बल 14 लाख कोटी रुपये मिळाले. त्या अगोदरच्या वर्षापेक्षा या कर संकलनात 49 टक्क्यांची वाढ झाली आहे.
त्यामुळे आता केंद्र सरकारने यावर्षी प्रत्यक्ष कर संकलनातून 14.20 लाख कोटी रुपये जमा करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. सरकारने गेल्या पाच वर्षांमध्ये करदात्यांचे अनेक प्रश्न सोडविले आहेत. त्याचबरोबर कर भरण्यातील गुंतागुंत कमी केली आहे.
त्यामुळे करदात्यांचा कर व्यवस्थेवरील विश्वास वाढण्यास मदत झाली आहे. देशात उद्योग करणे सुलभ व्हावे यासाठी सरकारने सुरू केलेल्या व्यापक सुधारणाचा हा एक भाग म्हणून कर व्यवस्थेमध्ये सुधारणा केल्या जात असतानाच करासाठीची तांत्रिक व्यवस्था सुधारित करण्यात येत आहे.
त्यामुळे करदात्यांना कर भरणे सोपे जात आहे. कुठल्याही करदात्याला कसलाही त्रास होत नाही. मात्र जे लोक कर चूकवेगीरी करतात त्यांचा माग काढणारी यंत्रणा विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रामाणिक करदात्यांना कसलाही त्रास न होता कर संकलन वाढत आहे.
आगामी काळातही भारतामध्ये मोठ्या प्रमाणात कर संकलन वाढण्याची शक्यता आहे. यावेळी उपस्थित असलेले प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष नितीन गुप्ता यांनी सांगितले की, कर विभागाने चांगली कामगिरी केली असल्यामुळे कर विभागाची स्तुती होत आहे. मात्र यामुळे हुरळून न जाता अधिकाऱ्यांनी दक्ष राहून आगामी काळात कर संकलन वाढविण्याचा प्रयत्न करावा.