पिंपरी -इंधनाच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही “ई बाईक’ची मागणी वाढली आहे. मात्र अनेकजण या ई बाईकचा वेग वाढवण्यासाठी त्यामध्ये छेडछाड करत असल्याचे समोर आले आहे. बाइकच्या बॅटरीची क्षमता वाढवण्यासाठी बॅटरी बदलली जात आहे. त्यामुळे या बाईक पेट घेत असल्याच्या घटना घडू लागल्या आहेत.
मागील तीन ते चार वर्षांपासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहे. तसेच केंद्र सरकारकडून देखील प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रीक वाहन वापराबाबत जनजागृती केली जात आहे. तसेच ई बाईक खेरदी करणाऱ्यांना सबसिडी देखील दिली जाते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून इलेक्ट्रीक वाहने घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. आतापर्यंत पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये 7 हजार 951 ई बाईक्सची नोंद झालेली आहे. असे असले तरी अलीकडच्या काळात या वाहनांचा स्फोट होऊन आग लागल्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. यामुळे वाहन वापरणाऱ्या व्यक्तीसह इतरांना धोका निर्माण झाला आहे. मात्र ई बाईकमध्ये काही बदल केल्याने या बाईक पेट घेत असल्याची शंका तज्ज्ञांनी उपस्थित केली आहे.
अनेक वापरकर्ते वाहनाचा वेग वाढवण्यासाठी ई बाईकच्या बॅटरीमध्ये बदल करतात. ई बाईकला कंपनीकडून 250 वॅटची बॅटरी लावून देण्यात येते. त्याने सुमारे 50 ते 60 किलोमीटर ताशी वेग घेता येतो. तर ही बॅटरी शंभर किलोमीटर अंतर पार करण्यास मदत करते. शंभर किलोमीटर अंतर पार केल्यानंतर वाहनाला चार्जिंग कऱण्याची आवश्यकता असते. त्यामुळे अनेकजण या वाहनांची बॅटरी बदलतात. 250 वॅटपेक्षा जास्त क्षमतेची बॅटरी बसवली जाते.
वाहनांचा वेग वाढण्यासाठी तसेच शंभर किमीपेक्षा जास्त अंतर जाण्यास बॅटरी बदलल्याने मदत होत असल्याचे मॅकेनिक भासवतात. त्यामुळे अनेकजण बॅटरी बदलतात. मात्र यामुळे ई बाईक्समध्ये बिघाड होऊन स्फोट होतो. त्यामुळे अशाप्रकारे बाईक्समध्ये छेडछाड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.