बारामती – शहर आणि जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. करोना मुक्तीसाठी भिलवाडा पॅटर्ननुसार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार बारामतीत कामकाज करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात झाला. बारामती शहर आणि तालुका गुरुवारी मध्यरात्रीनंतर पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. बारामती शहरातच बाहेरून येणारे सर्व रस्ते अत्यावश्यक सेवांची वाहने वगळून इतरांसाठी सील करण्यात आले आहे.
करोनाचा संसर्ग तालुक्यात पसरू नये म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, तहसिलदार विजय पाटील, मुख्याधिकारी योगेश कडुसकर, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, उपविभागीय कृषी अधिकारी बालाजी ताटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सुनील दराडे, डॉ. सदानंद काळे यांची बैठक झाली.
शहरात करोनामुळे एका भाजीविक्रेत्याचा मृत्यू झाला. शहरात तीन दिवसांपासून भाजीपाला मार्केट, मटन मार्केट, मासळी मार्केट बंद करण्याचा निर्णय नगरपालिकेने घेतला आहे. तरी देखील नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. हा संसर्ग आणखी वाढू नये म्हणून प्रशासन सर्व पद्धतीने प्रयत्न करीत आहे. परंतु याची कडक अंमलबजावणी व्हावी, या उद्देशाने मध्यरात्रीपासून बारामती शहर व तालुक्याच्या परिसरात फिरताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे.
एखाद्या कुटुंबातं अंत्यविधी करतानाही गर्दी होणार नाही. याची काळजी घेऊन कमीत कमी लोकांत अंत्यसंस्काराची प्रक्रिया पार पाडावी. शहरात विविध बॅंकांचे एटीएमच्या ठिकाणी सॅनेटायझर्सचा वापरही आता अनिवार्य केला जाणार आहे. बॅंकात गर्दी होणार नाही. याबाबत बॅंकेने गर्दी कमी होईल, याचेनियोजन करावे.
त्यांच्यावर कारवाई
बारामती शहर व तालुक्यातील होम क्वारंटाइन केलेल्या कुठल्याही नागरिकांना कोणत्याही परिस्थितीत आता बाहेर जाता येणार नाही. परराज्यातून आलेले तसेच ज्यांना निवारा नाही त्यांना सांस्कृतिक केंद्रात नेऊन त्यांची राहण्याची, जेवणाची सोय करण्याबाबत निर्णय झाला. कुठल्याही कारणास्तव मुलांनी रस्त्यावर क्रिकेट खेळण्यासह घराबाहेर पडण्यासही आता सक्त मनाई करण्यात आली आहे. शहरातून वाहणाऱ्या नीरा डावा कालव्यावर पोहोण्यासाठी जाणाऱ्या मुलांवर देखील आता कारवाईला सामोरे जावे लागेल.
अनावश्यक पासेस रद्द होणार
पोलिसांकडून देण्यात आलेले अत्यावश्यक सुविधां पुरविण्यासाठी देण्यात आलेल्या पासेसचाही फेरआढावा घेतला जाणार असून अनावश्यक पासेस यातून रद्द केले जाणार आहेत. नागरिकांनी रस्त्यावर येऊ नये यासाठी सर्व परीने नियोजन केले जात आहे.नागरिकांनी औषधे, अन्नधान्य, दूध व जीवनाश्यक वस्तूंसाठी, घराबाहेर पडण्यापेक्षा ती घरपोच कशी देता येईल, या दृष्टीनेही प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले आहे. नगरपालिका क्षेत्रात, प्रत्येक वॉर्डनिहाय दुकानांची नावे व त्यानुसार जबाबदारीचे वाटप केले जाणार आहे.
भिलवाडा पॅटर्नचा अवलंब
राजस्थानमधील भिलवाडामध्ये ज्याप्रमाणे पूर्णपणे लॉकडाऊन करून करोनावर नियंत्रण मिळविण्यात आले आहे. तसेच बारामतीत आता करण्याची वेळ आल्याचे सांगण्यात आले. बारामती शहरातील प्रत्येकाची घरोघर जाऊन तपासणी करणे, ही तपासणी एकदाच करुन थांबायचे नाही तर किमान तीनवेळा तपासणी करायची, या तपासणीसाठी वेगळी टीम काम करणार, ज्या नागरिकांना सर्दी, ताप व खोकल्याची लक्षणे आढळतील त्यांच्यावर विशेष लक्ष वैद्यकीय पथकांमार्फत पुरविले जाणार, सर्व जीवनाश्यक वस्तू लोकांनी दुकानात जाऊन खरेदी करण्यापेक्षाही त्यांना घरपोच पुरविण्याची व्यवस्था करणे, अशा उपायांचा भिलवाडा पॅटर्नमध्ये समावेश आहे.
बारामतीत अरोग्य विभागाची 161 व 89 पथके कार्यरत आहेत, त्यांच्या मार्फत या तपासण्या होणार आहेत. नागरीकांना स्वस्त धान्य दुकानातून सर्वांना तीन महिन्यांचे धान्य पुरविण्याचेही नियोजन या बैठकीत करण्यात आले. याचे समन्वय बारामतीचे तहसीलदार विजय पाटील करणार आहेत.