सातारा – गावागाड्यातील महत्त्वाचे पद व प्रतिष्ठा असलेल्या तलाठ्यांकडून सामान्य जनतेला नाडवले जाण्याच्या घटनांमध्ये काही नावीन्य नाही; पण माण तालुक्यातील वाकी-म्हसवड गावच्या अण्णासाहेबाने थेट तहसीलदारांच्या आदेशाला कोलदांडा घातला आहे.
वाळू व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याच्याकडून “लक्ष्मीदर्शन’ होतेय का, याची चाचपणी या तलाठ्याने केल्याचा प्रकार समोर आला आहे. वाकी-म्हसवड या गावात नदीपात्रातून सर्वाधिक वाळूचा उपसा होत असताना तलाठी भलत्याच गोतावळ्यात अडकल्याचे अनेक जण खासगीत सांगत असून याची खुमासदार चर्चा आहे.
वरकुटे- म्हसवड (ता. माण) येथून वाळतस्करी होत असल्याच्या तक्रारी प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे आल्या होत्या. त्यांनी या गावचे तलाठी नरळे यांना वेळोवेळी कारवाई करण्याचे निर्देश दिले होते; परंतु डोळ्यांदेखत वाळूच्या गाड्या भरून जात असताना त्याकडे तलाठ्याने दुर्लक्ष केल्याने प्रांताधिकारी जिरंगे यांनी कारवाईसाठी पुढाकार घेतला होता.
एका वाळूसम्राटाला धडा शिकवायचा म्हणून प्रांताधिकारी व त्यांच्या टीमने 29 जूनला तालुका पिंजून काढला होता. तालुक्यातील नदी-नाले शोधले तरी तो वाळूसम्राट हाती लागला नव्हता अन् लागण्याची शक्यताही नव्हती, कारण कुंपणच शेत खात होते. प्रांताधिकारी व टीम पहाटेच्या सुमारास दहिवडीकडे जात असताना ढाकणी फाट्यावर त्यांना दोन डंपर दिसले. ते त्यांनी ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी म्हसवड पोलिसांच्या ताब्यात दिले.
त्यानंतर दोन-तीन दिवस गेले तरी कारवाई होत नसल्याने डंपरचालकांनी पोलीस ठाण्यात हेलपाटे मारले. गुन्हा का दाखल झाला नाही, असे त्यांनी पोलिसांना विचारले असता, महसूल विभागाकडून फिर्याद आल्याशिवाय गुन्हा दाखल होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वैतागलेल्या चालकांनी घर गाठले.
तहसीलदार बी. एस. माने यांनी दि. 2 जुलै रोजी वरकुटे-म्हसवडचे तलाठी नरळे यांना गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले, तरी नरळे यांनी फिर्याद दाखल करण्याऐवजी डंपरमालकांशी हस्ते परहस्ते देण्या-घेण्याची बोलणी सुरू ठेवण्यात धन्यता मानल्याची चर्चा आहे.
परिणामी 29 जून रोजी पकडलेल्या गाड्यांवर गुन्हा दाखल करण्यास 16 जुलैचा दिवस उजाडला. दरम्यानच्या काळात गुन्हा दाखल होत नसल्याने डंपरमालकाने प्रांताधिकाऱ्यांना कळवले. त्यानंतर गुन्हा दाखल न झाल्यास नोटीस काढण्याचा इशारा प्रांताधिकाऱ्यांनी तलाठ्याला दिला. त्यानंतर तलाठ्याने डंपरमालकाला धडा शिकवण्यासाठी तो घटनास्थळी नसतानाही फिर्यादीत त्याच्या नावाचा उल्लेख केला. वरिष्ठांच्या पत्राला केराची टोपली दाखवणाऱ्या तलाठ्याला कोणाचा धाक नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
…म्हणे कामात व्यग्र होतो
तलाठी नरळे यांना वरिष्ठांचे पत्र 2 जुलैला आले; पण कामात व्यग्र असल्याने फिर्याद दाखल करण्यास विलंब झाल्याचे तलाठ्याने म्हटले आहे; परंतु त्यांना असे कोणते काम होते की, वरिष्ठांचा आदेश पाळायला वेळ नव्हता, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.