करोनाचे निमित्त मात्र, आयपीएलसाठी मिळाली विंडो
दुबई – जागतिक क्रिकेटवरील बीसीसीआयचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. बहुचर्चित टी-20 विश्वकरंडक लांबणीवर टाकण्यात आल्याने बीसीसीआयचे यंदाची आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी झालेल्या आयसीसीच्या बैठकीत ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये होणारी टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाल्याने आयपीएलचा मार्ग मोकळा झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांत आयसीसीने सातत्याने बैठका घेतल्या होत्या. मात्र, त्यात टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत कोणताही निर्णय झालेला नव्हता. मार्च महिन्यापासून करोनाचा धोका जगभरात वाढल्याने सुरुवातीपासूनच या स्पर्धेच्या भवितव्यावर टांगती तलवार आली होती. त्यातच ऑस्ट्रेलिया क्रिकेट मंडळाला करोनाचा चांगलाच फटका बसल्याने त्यांच्यावर दिवाळखोरीची वेळ आली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलिया मंडळाने आयसीसीच्या बैठकीत ही स्पर्धा आयोजित करण्यास असमर्थता व्यक्त केली. तेव्हाच टी-20 विश्वकरंडक पुढे ढकलला जाणार किंवा रद्दच केला जाणार असे संकेत मिळाले होते.
मात्र, आयसीसीने चालढकल करत या स्पर्धेला लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यासाठी वेळ लावला. या स्पर्धेवर आयपीएलचे भवितव्य अवलंबून असल्याने बीसीसीआयने अखेर आयसीसीला टी-20 विश्वकरंडकाबाबत लवकर निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी आयसीसीची बैठक झाली व त्यात टी-20 विश्वकरंडक स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्याचा अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आला.
बीसीसीआयने सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धा सुरू होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर सोमवारच्या आयसीसीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, दुपारी सुरू झालेल्या आयसीसीच्या बैठकीत स्पर्धा लांबणीवर टाकण्याची अधिकृत घोषणा तब्बल पाच तासांनी करण्यात आली. त्याचबरोबर भारतात 2023 साली होत असलेली एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धादेखील मूळ कार्यक्रमानुसार मार्च-एप्रिल याऐवजी नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.