माजी कसोटीपटू दिलीप दोशी यांचे मत
मुंबई – चेतेश्वर पुजारावर कसोटी फलंदाज असा शिक्का बसलेला असला तरीही तो एकदिवसीय सामन्यांमध्ये आक्रमक फलंदाजी करू शकतो. मी जर कर्णधार असतो तर त्याला एकदिवसीय संघातून कधीही बाहेर ठेवले नसते, असे सांगत भारताचे माजी कसोटीपटू दिलीप दोशी यांनी पुजाराला एकदिवसीय सामन्यांमध्येही खेळवले पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे.
पुजाराला एकदिवसीय संघात खेळवले गेले तर त्याचा भारतीय संघाला खूप लाभ होऊ शकतो. त्याच्याकडे तंत्र आहे, संयम आहे. संघाचे सुरुवातीचे बळी गेले तर डाव सावरण्याची क्षमता आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
खरेतर संघनीती आता काळानुरूप बदलली गेली आहे. पूर्वी संघाच्या 200-225 धावा झाल्या की सामना जिंकण्याच्या आशा वाढलेल्या असायच्या. आता त्रिशतकी धावाही कमी पडतात. अशा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना एक बाजू सांभाळण्यासाठी पुजारासारख्या तंत्रशुद्ध फलंदाजाचीच गरज असते. टी-20 क्रिकेटने सर्व आयाम बदलून टाकले असले तरी आजही तंत्रशुद्ध फलंदाजीला पर्याय नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.