वाई, (प्रतिनिधी) – धोम धरणाच्या खालील बाजूस व्याहळी ते धोम दरम्यान कृष्णा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. या पुलामुळे वाई तालुक्याच्या पश्चिम भागाच्या वैभवात भर पडली आहे. जोर व जांभळी खोर्याला जोडणार्या या पुलामुळे नागरिकांना वाईहून येण्या-जाण्यासाठी लागणारे अंतर कमी होऊन, वेळ आणि इंधनाच्या खर्चाची बचत होणार आहे.
या भागात धोम व बलकवडी धरणांचे जलाशय, सह्याद्री पर्वताचे निसर्गसौंदर्य धोम येथील देवदेवतांची पुरातन मंदिरे, गायमुख पाहण्यासाठी पर्यटकांची वाढ होऊन स्थानिक बेरोजगार युवकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
महाबळेश्वरमध्ये उगम पावलेल्या कृष्णा नदीवर धोम व बलकवडी येथे धरणे बांधण्यात आल्याने हजारो एकर जमीन जमीन ओलिताखाली आली आहे. दुष्काळी भागालाही पाणी मिळाले आहे. मात्र, येथील भूमिपुत्रांचे विस्थापन झाले. या भागातील नागरिकांची गेली कित्येक वर्षांची पुलाची मागणी होती. कारण, पावसाळ्यात किंवा एरवी पलीकडे जाण्यासाठी वाई शहरातून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे 16 किलोमीटर अंतर वाढून, वेळ आणि इंधनाचा खर्चही वाढला होता.
या नवीन पुलामुळे आता हा खर्च व वेळ वाचणार आहे. त्यामुळे या भागातील जनतेत समाधानाचे वातावरण आहे. येथे पर्यटकांची संख्या वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. व्याहळी ते धोम या रस्त्यासाठी निधी उपलब्ध झाला असून, हा रस्ताही लवकरच पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
नवा पूल पर्यटकांसाठी ठरणार आकर्षण
या नवीन पुलासाठी साडेआठ कोटी रुपयांचा निधी खर्च झाला आहे. पुलाची लांबी 93.94 मीटर असून, 16.477 मीटरचे दोन आणि 15.477 मीटरचे चार गाळे पुलाला आहेत. पुलाची रुंदी दहा मीटर असून, आरसीसी आर्च पद्धतीच्या उंच पुलाच्या दोन्ही बाजूंना 50 मीटर लांबीचे पोहोच रस्ते करण्यात आले आहेत. पावसाळ्यात धोम धरणातून नदीत पाणी सोडल्यानंतरही या पुलावरून प्रवास करता येणार आहे. हा पूल स्थानिक आणि पर्यटकांसाठी आकर्षण व सेल्फी पॉइंट ठरणार आहे.
या पुलामुळे जोर आणि जांभळी खोर्यांमधील शेतकर्यांना शेतीमालाची वाहतूक करण्याचा आणि स्थानिक नागरिक व पर्यटकांना प्रवासासाठी जवळचा मार्ग उपलब्ध झाला आहे. या पुलामुळे अंतर, वेळ आणि इंधनाची बचत होईल -महेश गोंजारी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाई.