नवी दिल्ली – करोना संकट कायम असल्याने आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवरील स्थगितीला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे होणार नाहीत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) बुधवारी संबंधित निर्णयाची माहिती दिली.
अर्थात, निवडक मार्गांवर विशेष परवानगी असणारी आंतरराष्ट्रीय उड्डाणे होऊ शकतील. भारतात करोना संकट घोंघावू लागल्यानंतर 23 मार्च 2020 पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद ठेवण्यात आली. त्या स्थगितीला वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली. मात्र, वंदे भारत अभियानांतर्गत मागील वर्षाच्या मेपासून विशेष उड्डाणे झाली.
त्याशिवाय, भारताने 24 देशांशी द्विपक्षीय करार केले. त्याअंतर्गत भारत आणि संबंधित देश एकमेकांच्या भूमीत विमान वाहतूक करू शकतात. प्रवासी विमान उड्डाणांना स्थगिती असली तरी आंतरराष्ट्रीय मालवाहतूक सुरू राहील.