मुंबई – करोनाकाळातही आंदोलन सुरू आहेत. दुसऱ्या लाटेतील समस्यांतून आपण काहीच शिकलो नाही हे दुर्दैवी आहे, असे मत हायकोर्टाने व्यक्त केले आहे. तसेच आरक्षणाच्या मुद्यावरुनही आंदोलने सुरू आहेत. आरक्षणाचा मुद्दा तर न्यायप्रविष्ट आहे, तरी या मुद्यांचे राजकारण करणाऱ्या पुढाऱ्यांनी सध्याच्या परिस्थितीचा थोडा विचार करायला हवा, असे खडेबोल न्यायालयाने सुनाविले.
या प्रकरणी स्नेहा मरजादी यांनी ऍड. अर्शिल शहा यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकांवर बुधवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली.
करोना दरम्यानच्या विविध समस्यांबाबत हायकोर्टात सुरू असलेल्या विविध याचिकांवर सुरू असलेल्या एकत्रित सुनावणीदरम्यान नवी मुंबईत विमानतळाच्या नामकरणासाठी झालेल्या आंदोलनाबाबत न्यायालयाने विविध प्रश्न उपस्थित केले.
तसेच सरकारला हे थांबवणे शक्य नसेल तर आम्हालाच कठोर निर्णय द्यावा लागेल, असे म्हणत न्यायालयाने राज्यात सुरू असलेल्या आंदोलनांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच शुक्रवारी होणाऱ्या पुढील सुनावणीत निकाली निघालेल्या समस्या आणि सध्याच्या समस्या याची तक्त्यानुसार माहिती सादर करण्याचे निर्देश देत सर्व याचिकांवरील सुनावणी शुक्रवारपर्यंत तहकूब केली.