नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय प्रवासी विमान उड्डाणांवरील स्थगितीला 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. करोना संकट कायम असल्याने तो निर्णय घेण्यात आला आहे.
भारतात करोना संकट दाखल झाल्यानंतर सर्वप्रथम मागील वर्षीच्या 23 मार्चपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांना स्थगिती देण्यात आली. त्या स्थगितीला सातत्याने मुदतवाढ देण्यात आली. आता ती स्थगिती महिनाभर कायम राहणार असल्याचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने शुक्रवारी जाहीर केले.
अर्थात, विशेष मंजुरी असलेल्या उड्डाणांना आणि आंतरराष्ट्रीय हवाई मालवाहतुकीला परवानगी असेल. स्थगितीच्या काळातही मागील वर्षीच्या मेपासूून वंदे भारत अभियानांतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू राहिली. परदेशांत अडकलेल्या भारतीयांना मायदेशात आणण्यासाठी ते अभियान राबवण्यात आले. त्याशिवाय, भारताने 27 देशांशी द्विपक्षीय करार केले.
त्या करारांनुसार संबंधित देशांच्या विमानांना परस्परांच्या भूमीत उड्डाणे करण्यासाठी मागील वर्षीच्या जुलैपासून मुभा मिळाली. भारतात सध्या करोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर, आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या स्थगितीचा कालावधी वाढवण्यात आला आहे.