नवी दिल्ली – दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेल्या “ओमिक्रोन’ या करोना विषाणूमुळे पुन्हा नवीन संकट ओढावले आहे. यामुळे देशात आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याचा घेण्यात आलेल्या निर्णयाचा पुर्नविचार करण्यात येणार आहे. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठीही एसओपी निश्चित करण्यात येणार आहे.
केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या तातडीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीस व्ही. के पॉल, विजय राघवन, पंतप्रधानांचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह तज्ज्ञ उपस्थित होते.
गृह मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या बैठकीत ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर एकूण जागतिक परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेण्यात आला आणि विविध प्रतिबंधात्मक उपायांवर आणि निर्बंधावर चर्चा करण्यात आली.
जागतिक परिस्थितीनुसार देशात आंतरराष्ट्रीय विमान सेवा पुन्हा सुरू करण्याबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पुनरावलोकन करण्यात येईल. तसेच आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या चाचणी आणि क्वारंटाईन कालावधीही ठरविण्यात येईल. विशेषताः विमानतळ आणि बंदरांवर चाचणी प्रोटोकॉलची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहे, अशी माहिती प्रवक्त्याने दिली.
याशिवाय देशातील उदयोन्मुख साथीच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल, असे प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, 20 महिन्यांहून अधिक कालावधीनंतर केंद्र सरकारने 15 डिसेंबरपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणे पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली होती.