मुंबई : राज्यात मविआचे सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आले. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात कायदेशीर लढा सुरू असून हे प्रकरण थेट निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आले आहे. याबाबत लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे.
सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागात सभा घेत आहेत. या यात्रेचा समारोप मुंबईत होईल, असे त्या म्हणाल्या आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. “समारोपाची मोठी सभा मुंबईला होईल. त्यासाठी उद्धव ठाकरे, राज्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मविआतील सगळे नेते उपस्थित असतील. ठाकरे गटाच्या मोठ्या ८ सभा होतील”, असे त्या म्हणाल्या.
दरम्यान, पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंचे पक्षाध्यक्षपदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्याचा समाचार घेताना अंधारेंनी आगपाखड केली. “काही पेड ट्रोलर्स चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण सांगतात की ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख, पक्ष बेकायदेशीर आहेत, मान्यता आम्हालाच मिळणार आहे’. संजय शिरसाटसारखा माणूस असं सांगत असेल तर मग निवडणूक आयोगाने तुमच्या कानात येऊन हे सांगितलंय का? निवडणूक आयोग तुमच्या घरचं आहे का? तुम्ही इतक्या ठामपणे सांगताय, तर मग तुमची आणि आयोगाची साठगाठ झाली आहे का? नसेल झाली, तर तुमच्यावर खटला दाखल करावा का?” असा प्रश्न सुषमा अंधारेंनी उपस्थित केला.
तसेच “वस्तुस्थिती ही आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचे आमदार किंवा खासदार किती आहेत, यावर पक्षाची मान्यता ठरत नसते. जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, त्यानुसार हे मी सांगते. एखादा पक्ष प्रादेशिक आहे की राष्ट्रीय किंवा त्या पक्षाला निवडणूक चिन्ह काय द्यायचं हे त्या पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी किती आहे, यावर ठरतं. ही मतांची टक्केवारी शिवसेनेने सिद्ध केलेली आहे. अंधेरी पूर्वच्याही निवडणुकीला आपण सामोरे गेलो आहोत. शिंदे गटात गेलेल्या आमदारांचीही मतांची टक्केवारी आपलीच आहे. ते निवडणुकीलाच कधी सामोरे गेलेले नाहीत, तर मतांची टक्केवारी कुठे आहे त्यांच्याकडे? हा कायद्याचा पेच आहे”, असे सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.