नवी दिल्ली – युवा कुस्तीपटू सागर धनखडच्या हत्येच्या आरोपात अटकेत असलेल्या ऑलिम्पिक पदकविजेत्या सुशील कुमारवर मारहाणीचा अजून एक आरोप करण्यात आला आहे. तसेच सागर धनखडच्या हत्ये प्रकरणात जामीन मिळू नये, यासाठी पोलिसांकडून सुशीलवर मोक्का लावण्यात येण्याचे संकेत मिळत आहेत.
दरम्यान, सुशील कुमारने एका व्यावसायिकाला मारहाण केल्याचे प्रकरण आता समोर आले आहे. या व्यावसायिकाने आपल्यावर झालेल्या मारहाणीच्या घटनेची माहिती दिली आहे. आपल्याला सुशील कुमारने मारहाण केल्याचेही त्याने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. आता याप्रकरणी सुशील कुमारवर अजून एक गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
या व्यावसायिकाचे नाव अलोक सिंग असून, त्याने सुशील कुमारवर मारहाणीचा आरोप केला आहे.
चार लाख रुपयांची थकबाकी शिल्लक होती. त्यामुळे हे पैसे मागण्यासाठी सुशील कुमारकडे गेलो होतो. त्यावेळी सुशील कुमारने मला पैसे देण्यास नकार दिला. पण मी त्यानंतरही त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावेळी सुशील कुमारने मला मारहाण केली. त्यानंतर सुशील कुमारबरोबर असलेल्या काही कुस्तीपटूंनीदेखील मला मारहाण केली. ही मारहाण झाल्यावर काही दिवस माझी प्रकृती गंभीर होती, असेही या व्यावसायिकाने सांगितले आहे.
दरम्यान, सागर धनखडची हत्या झाल्यानंतर सुशील कुमार फरार होता, तेव्हा तो एका मोबाइल फोनचा वापर करत होता. या मोबाइलमुळेच तो आपल्या जवळच्या व्यक्तींच्या संपर्कात होता. मात्र, हा मोबाइल पोलिसांना सापडलेला नाही. या मोबाइलमध्ये डोंगल वापरून सुशील कुमार इंटरनेट कॉल्सच्या माध्यमातून आपल्या लोकांच्या संपर्कात होता.
सागरला जेव्हा मारहाण झाली तेव्हा सुशील कुमार तिथे होता. पण या दिवशी सुशील कुमारने जे कपडे परिधान केलेले होते, तेदेखील अजून दिल्ली पोलिसांना मिळालेले नाहीत. त्यामुळे या गोष्टीचा तपासही पोलीस करत आहेत. सुशील कुमार तब्बल 18 दिवस फरार होता. या 18 दिवसांमध्ये तो कोणाला भेटला, त्याचबरोबर कोणी त्याला मदत केली, या गोष्टींबाबतही पोलीस तपास करत आहेत. सुशील कुमार फरार असताना त्याने सात गाड्यांचा वापर केला होता. पण या सर्व गाड्यांच्या मालकांचाही शोध घेतला जात आहे.
हरिद्वारला तपासासाठी पोलीस रवाना
दिल्ली पोलीस सुशील कुमारला जामीन मिळू नये, यासाठी त्याच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्याच्या तयारीत आहेत. हा मोक्का लावला गेला तर त्यात जन्मठेपेचीही शिक्षा होऊ शकते. तसेच, पोलिसांना आरोपपत्र दाखल करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतही मिळते.
सुशील कुमारला दिल्ली पोलीस हरिद्वारला घेऊन गेले असून, फरार असताना ज्या आश्रमात तो राहात होता तेथेही तपास व चौकशी केली जाणार आहे. सागरच्या हत्येनंतर सुशील उत्तराखंडला गेला व तेथून तो हरिद्वार आणि ऋषिकेशला गेला होता. अजय बक्करवाला आणि सुशील यांनी सागरचा मोबाइल फोन हरिद्वार येथे टाकून दिला होता.