-माधव विद्वांस
नाट्य, चित्रपट अभिनेते, लेखक, चित्रकार, शिल्पकार, निर्माता, दिग्दर्शक आणि ग्रामीण चित्रपटांतील “गावचा पाटील’ ही भूमिका समर्थपणे वठविणारे सूर्यकांत मांढरे यांचा आज स्मृतिदिन. त्यांचे पूर्ण नाव वामन तुकाराम मांढरे. त्यांचा जन्म तानुबाई आणि तुकाराम मांढरे या दांपत्याच्या पोटी कोल्हापूर येथे सन 1925 मध्ये झाला होता. त्यांच्या वडिलांचे इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचे दुकान होते व ते नाटक-चित्रपटांचेही शौकीन होते.
सूर्यकांत यांचे शिक्षण कोल्हापुरातील सरस्वती विद्यालयात आणि हरिहर विद्यालयात पार पडले. तालीम संस्कृतीच्या कोल्हापुरात मांढरे बंधूंना व्यायामाची आवड असणे स्वाभाविकच होते. उंचापुरे, बलदंड असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. थोरले बंधू चंद्रकांत हेसुद्धा अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते. चंद्रकांत-सूर्यकांत ही नावे जोडीनेच घेतली जायची. सूर्यकांत यांचे उमदे आकर्षक रूप भालजी पेंढारकरांच्या नजरेस पडले आणि वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी वर्ष 1938 मध्ये त्यांनी सूर्यकांत यांना “ध्रुव’ या चित्रपटात प्रथम संधी दिली व त्यांचे रूपेरी पडद्यावर पदार्पण झाले. शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचे मन अभिनयाकडे आणि चित्रकलेकडे ओढ घेत होते.
बाबा गजबर या एका जाणकार चित्रकाराकडे ते चित्रकलेचे धडे गिरवू लागले. वर्ष 1943 मध्ये शिवचरित्रातील गुप्तहेर बहिर्जी यांच्यावर असलेल्या “बहिर्जी नाईक’ या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बालशिवाजी महाराजांची भूमिका केली. या चित्रपटाच्या श्रेयनामावलीपासून भालजी पेंढारकरांनी त्यांचे नाव “सूर्यकांत’ ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटांत ते “सूर्यकांत’ याच नावाने पडद्यावर दिसू लागले. चित्रपटसृष्टीत स्थिरावल्यावर 26 डिसेंबर, 1947 साली सूर्यकांत यांचा सुशीला पिसे यांच्याबरोबर विवाह झाला. धकाधकीच्या अभिनयाच्या व्यवसायात व्यस्त असताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडेही दुर्लक्ष केले नाही.
वर्ष 1950 मध्ये राजा नेने यांनी दिग्दर्शित “केतकीच्या बनात’ या चित्रपटात “सर्जेराव’ ही भूमिका केली. “फक्त प्रौढांसाठी’ असे मराठीत पहिल्यांदाच शिफारसपत्र या चित्रपटास मिळाले होते. त्यानंतर एकामागून एक चित्रपटाचे नायक त्यांनी साकारले व 100 हून अधिक चित्रपट केले. तमाशाप्रधान, ऐतिहासिक कथानकाबरोबर पांढरपेशा शहरी जीवनावरील “स्त्री जन्मा तुझी कहाणी’, “गृहदेवता’, “बाळा जो जो रे’ या चित्रपटातील नायकही सुरेखपणे उभे केले होते. त्यांची जयश्री गडकर या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली. या जोडीने एकंदरीत 27 चित्रपटांत एकत्र काम केले.
सूर्यकांत यांनी सुलोचना आणि उषाकिरण यांच्याबरोबरही केलेले चित्रपट प्रेक्षकांना आवडले. चित्रपटांबरोबरीने रंगभूमीची सेवाही सुरूच होती. “बेबंदशाही’, “आग्य्राहून सुटका’, “तुझे आहे तुजपाशी’, “लग्नाची बेडी’, “झुंजारराव’ या नाटकातूनही त्यांनी अभिनय केला. कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या उभारणीतही त्यांनी योगदान दिले.
सूर्यकांत यांच्या नावाचे एक कलादालन पुण्यामध्ये होते. यामध्ये त्यांच्या चित्र, शिल्पकलाकृती, तसेच त्यांना राज्य सरकार व विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार जतन करून ठेवण्यासाठी त्या वस्तू मांढरे कुटुंबियांनी पुणे महापालिकेच्या स्वाधीन केल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या मुलांनी त्या सर्व वस्तू कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठाडे सुपूर्त केल्या. येथे त्यांनी काढलेली पेंटिग्स तसेच शिल्पे व त्यांना मिळालेले पुरस्कार पाहण्यास मिळतात.
ते उत्तम वक्ते होते तसेच लेखकही होते, त्यांना रोजनिशी लिहिण्याची सवय होती. त्यावरून शिवशाहीत बाबासाहेब पुरंदरे यांचे प्रेरणेतून त्यांनी आत्मचरित्र लिहिले. या आत्मचरित्राला राज्य पुरस्कार मिळाला होता. सूर्यकांत यांनी 1978 साली “ईर्षा’ या चित्रपटाची निर्मिती-दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले. अशा हरहुन्नरी कलाकाराचे वयाच्या 73व्या वर्षी 22 ऑगस्ट 1999 रोजी निधन झाले.