नवी दिल्ली – भारताचा स्टार क्रिकेटपटू सुरेश रैना याने देशात लॉकडाऊन वाढीला समर्थन दिले आहे. देश सध्या खूप मोठ्या संकटातून जात आहे, अशा वेळी आपण सर्वांनीच जबाबदारी ओळखली पाहिजे. सरकारला, यंत्रणांना सर्वतोपरी मदत केली पाहिजे असेही रैनाने आवाहन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना लॉकडाऊनचा कालावधी 3 मे पर्यंत वाढविल्याचे जाहीर केल्यानंतर आपल्या ट्विटर हॅण्डलवरुन रैनाने या निर्णयाला समर्थन दिले. आज अन्य कोणत्याही गोष्टींपेक्षा जनतेच्या जीवाला महत्त्व आहे. लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाने आपापल्या घरातच थांबणे म्हणजेच करोनाविरुद्धच्या लढ्यात सहभागी होण्यासारखेच आहे. सरकारने जनतेच्या भल्यासाठीच हा निर्णय घेतला आहे. या प्रकारच्या धोरणामुळेच करोनाचा धोका देशातून संपूष्टात येईल, असा विश्वासही रैनाने व्यक्त केला.