Suraj Chavan : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यावरून आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यानंतर सत्ताधारी आता शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनीही अजित पवारांवर त्यांच्या आजारावरून निशाणा साधला आहे. अजित पवारांच्या आजाराविषयी बोलताना,”मराठा समाज जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अंगावर आला, तेव्हा अजित पवारांना डेंग्यू झाला, अशी उपरोधिक टीका रामदास कदम यांनी केली. याच टीकेला आता अजित पवार गटाकडून कदम यांना सडेतोड उत्तर देण्यात आले आहे.
रामदास कदमांच्या यांनी अजित पवारांनी केलेल्या टीकेला आता अजित पवार गटाचे नेते सूरज चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार हे रामदास कदमांच्या आकलनाबाहेरचे नेते आहेत. त्यामुळे त्यांनी जेवढं आकलन आहे, तेवढंच वक्तव्य करावं. नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते, असे प्रत्युत्तर सूरज चव्हाण यांनी दिले आहे. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली आहे.
रामदास कदमांना उत्तर देताना सूरज चव्हाण यांनी,“अजित पवार हे आपल्या आकलनाबाहेरचे नेते आहेत, हे रामदास कदमांनी आधी लक्षात ठेवावं. एखाद्या व्यक्तीच्या आजारपणावर बोलू नये, यातून आपले संस्कार दिसतात. पवार कुटुंब किंवा अजित पवार हे आपल्या आकलनाबाहेरचे विषय आहेत. त्यामुळे आपलं जेवढं आकलन आहे, तेवढंच आपण वक्तव्य करावं. नाहीतर डोळ्याला झंडूबाम लावून रडण्याची वेळ येते.” असे म्हणत त्यांनी कदम यांच्यावर सडकून टीका केली आहे.
दरम्यान,रामदास कदम यांनी अजित पवार यांच्या आजारावर बोलताना, “उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार शरद पवारांचे आशीर्वाद घ्यायला गेले, हे आपण समजू शकतो. पण काल दिलीप वळसे पाटीलही पवारांकडे आशीर्वाद घ्यायला गेले. सुनील तटकरेही आशीर्वाद घ्यायला गेले आणि तिथून ते अमित शाहांना भेटायला दिल्लीत गेले. मराठा समाज जेव्हा एकनाथ शिंदेंच्या अंगावर आला, तेव्हा नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. अजित पवारांचे २० पैकी २० आमदार एकनाथ शिंदे आणि शासनाच्या विरोधात मंत्रालयात आंदोलन करू लागले. त्यांनी मंत्रालयाचं गेट बंद केलं, हेच मला कळत नाही.” असे म्हणत सत्ताधारी नेत्यांवरही निशाणा साधला होता. त्यालाच सूरज चव्हाण यांनी उत्तर दिले आहे.