मुंबई – “रामनवमी, हनुमान जयंती दंगलीसाठीच झालीय की काय असे वाटते,’ असे वादग्रस्त वक्तव्य राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी भाजपच्या वतीने निदर्शने करत अंधेरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने काल घाटकोपरमध्ये एक शिबिर झाले. या शिबिरात जितेंद्र आव्हाडांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना मोकळा श्वास आणि मन मोकळं करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे जर कोणी काही वक्तव्य केलं असेल तर त्यावर लगेच गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे. कोणीही काहीही बोलले तर लगेच केस करू नये, त्यापेक्षा आपण सर्वांनी मिळून तारतम्य बाळगलं पाहिजे. लगेच केस करणं ही पद्धत सर्वच राजनेत्यांनी थांबवली पाहिजे.”
तर दुसरीकडे, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात मुंबईच्या अंधेरी पूर्व एमआयडीसी पोलिस ठाण्यामध्ये भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजिंदर सिंग यांनी तक्रार दाखल केली आहे. यावेळी ते म्हणाले की, ‘जितेंद्र आव्हाड हे पाकिस्तानची भाषा बोलत आहेत. रामनवमी आणि हनुमान जयंतीची शोभा यात्रा हिंदुस्थानमध्ये नाही काढणार तर काय पाकिस्तानमध्ये साजरी करणार का?’, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘जर हिंदू धर्माच्या विरोधात जितेंद्र आव्हाडांनी सतत अपमान सुरू ठेवले तर ते जिथे दिसतील तिथे आम्ही त्यांचे चप्पलांनी स्वागत करु’, असा इशारा तेजिंदर सिंग यांनी दिला.
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड ?
घाटकोपरमधील एका शिबिरात आव्हाड म्हणाले होते की, “छत्रपती संभाजीनगरला दंगल झाली. आता रामनवमी आणि हनुमान जयंती उत्सव दंगलीसाठीच झालाय की काय असे वाटते. यंदाचे वर्ष जातीय दंगलीचे आहे. कारण हे नोकऱ्या देऊ शकत नाहीत. भाव कमी करू शकत नाहीत. राजकीय अस्थिरता कमी करू शकत नाहीत. राजकीय अवमूल्यन झालेले आहे. सगळ्या बाजूंनी उतार लागलेला आहे. सर्वात सोपे काय आहे, असे धार्मिक सोहळे करा. त्या सोहळ्यातून मते जमा करा. नाहीच जमले, तर आग लावून टाका.” आव्हाडांच्या याच वक्तव्यावरून आता भारतीय जनता पक्ष आक्रमक झाला आहे.