Bihar Political Crisis : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आज एक मोठे पाऊल उचलत आपल्या पदाचा राजीनामा दिला. जेडीयू विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन आपल्या मुख्यामंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. त्यामुळे बिहारमध्ये आरजेडी, जेडीयू, काँग्रेस आणि डाव्यांची युती तुटली. आता नितीशकुमार भाजपच्या पाठिंब्याने सरकार स्थापन करण्याचा दावा करणार आहेत.
अशात यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेत्या सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या,’इंडिया आघाडीत प्रत्येकजण आपआपल्या परीने काम करतोय. ही आमच्या पक्षाची वैयक्तिक लढाई नसून वैचारिक लढाई आहे. दिल्लीत दडपशाही होत आहे, यंत्रणेचा गैरवापर करून सत्ता फोडणे, घरे फोडण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. याचा आम्ही जाहीर निषेध करतोय. या दडपशाहीविरोधात आमची लढाई सुरूच राहणार ‘ असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नव्या सरकारमध्ये नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील. त्यांच्यासोबत भाजपचे दोन नेते उपमुख्यमंत्री होणार आहेत. उपमुख्यमंत्री कोण होणार याबाबत सस्पेंस कायम आहे. मात्र, सुशील मोदी आणि रेणू देवी उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.
नितीश कुमार आज दुपारी 4 वाजता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची ही 9वी वेळ असेल. 6 ते 8 नेते मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. जीतन राम मांझी यांच्या हम या पक्षाचाही नव्या सरकारमध्ये समावेश होणार आहे. मांझी आपले समर्थन पत्र नितीश कुमार यांना सादर करणार आहेत.
लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार यांचे हे पाऊल भारतातील विरोधी पक्षांच्या आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. वास्तविक नितीश कुमार हे इंडिया आघाडीचे शिल्पकार मानले जातात. शुक्रवारीच जेडीयूशी संबंधित सूत्रांनी सांगितले होते की, नितीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजक न बनवल्यामुळे आणि जागा वाटपाच्या विलंबामुळे ते नाराज होते.
नितीश कुमार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने लालू यादव यांच्या पक्ष राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) च्या अनेक आमदारांनी सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले. राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी 122 आमदारांची गरज आहे. आरजेडीकडे 115 आमदार आहेत.