Nitish Kumar : सध्या बिहारमध्ये मोठी राजकीय उलटापालट झाल्याचे पाहायला मिळत आहे. नितीश कुमार महागठबंधनमधून बाहेर पडतील आणि भाजपाशी हातमिळवणी करून राज्यात पुन्हा नव्याने सरकार स्थापन करणार असल्याच्या चर्चांना मागील काही दिवसनपासून उधाण आले होते.
अखेर या चर्चा खऱ्या ठरल्या असून नितीश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी काही वेळापूर्वी राजभवन येथे जाऊन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला आहे. दरम्यान, त्यांनी आपल्यावर राजीनामा देण्याची वेळ का आली याविषयी यावेळी माहिती दिली.
राज्यपालांकडे सुपूर्द केलेल्या राजीनाम्यात नितीश कुमार यांनी लिहिलं आहे की, आम्ही महागठबंधनशी नातं तोडलं आहे. त्यानंतर आता नितीश कुमार आता भारतीय जनता पार्टीबरोबर मिळून बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन करणार आहेत. आज सायंकाळी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, तर भाजपा नेते सुशीलकुमार मोदी यांची उपमुख्यमंत्री म्हणून निवड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Nitish Kumar tendered his resignation as the Chief Minister of Bihar to Governor Rajendra Arlekar. The Governor accepted the resignation and deputed him as the Acting CM. pic.twitter.com/uaDXROe6PA
— ANI (@ANI) January 28, 2024
राजीनामा दिल्यानंतर राजभवनाबाहेर नितीश कुमार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यावेळी, “मी नुकताच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तसेच राज्यपालांना राज्यातलं विद्यमान सरकार विसर्जित करण्यास सांगितलं आहे.” असे त्यांनी म्हटले. त्यापाठोपाठ नितीश कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी फोनवरून संवाद साधला.
नितीश कुमार आता भाजपाबरोबर सत्ता स्थापन करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत सायंकाळी चार वाजता त्यांचा शपथविधी होणार असल्याचे माध्यमांमधून प्रसिद्ध करण्यात येत आहे.
दरम्यान, नितीश कुमार यांना यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला की, तुमच्यावर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची परिस्थिती का उद्भवली? त्यावर नितीश कुमार यांनी, राज्यकारभार योग्य रितीने चालत नव्हता, त्यामुळे माझ्यावर राजीनामा देण्याची वेळ आली. तुम्ही पत्रकारांनी मला यापूर्वी अनेकदा विचारल होतं. परंतु, तेव्हा मी बोलणं बंद केलं होतं.
आम्ही सर्व परिस्थिती पाहत होतो. त्यानंतर मला लोक वेगवेगळे सल्ले देऊ लागले. मी माझ्या पक्षातील सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांचे वेगवेगळे सल्ले घेतले. त्यानंतर आज राजीनामा दिला आहे आणि आमचं सरकार विसर्जित केलं आहे.असे स्पष्टीकरण नितीशकुमार यांनी यावेळी दिले.
पुढे बोलताना नितीश कुमार यांनी, “आम्ही आधी भाजपाबरोबर युती केली होती. ती युती तोडून यांच्याबरोबर (राजद) आघाडी बनवली. परंतु, इथे येऊनही काही सुरळीत चालत नव्हतं. आमच्या लोकांना त्रास होत होता. ते मेहनत घेत होते. परंतु, काही गोष्टींचं त्यांना वाईट वाटत होतं. त्यामुळे मी या निर्णयापर्यंत पोहोचलो.” असल्याचे त्यांनी सांगितले.