मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत वक्तव्य केलं होत. यावेळी बोलताना, पाटील यांनी वापरलेला एक शब्द व त्यावेळीचे त्यांचे हावभाव यावर अनेकांनी आक्षेप नोंदवला होता. याबाबत स्पष्टीकरण देताना चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मूळ वक्तव्याची पाठराखण करत, ‘कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो’ असं म्हणत या प्रकरणाला पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला होता. यानंतरही शनिवारी पिंपरी येथे एका कार्यक्रमासाठी आलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली. मंत्री पाटील यांच्यावर झालेल्या शाई फेकीनंतर, आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलकांवर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून याबाबत आता प्रतिक्रिया उमटत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्यांविरोधात ३०७ कलम (हत्येचा प्रयत्न) लावल्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. “मला वाटतं, गृहमंत्र्यांचा कायदा हा नियमाप्रमाणे चालत नाही, तो त्यांच्या मर्जीप्रमाणे चालतो. ते अभिमानाने सांगतात, आमचं ‘ईडी’ सरकार आहे. असं त्या म्हणाल्या.
९५ टक्के गुन्हे हे विरोधी पक्षातील नेत्यांवर
“कुणीही त्यांच्या विरोधात बोललं तर त्याच्या पाठीमागे तपास यंत्रणांची चौकशी लावली जाते. देशातील राजकीय नेत्यांवरील एकूण गुन्ह्यांपैकी जवळपास ९५ टक्के गुन्हे हे विरोधी पक्षातील नेत्यांवर दाखल कले आहेत. त्यांच्या पक्षातील एखाद्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला, तर त्याला वाॉशिंग मशीनमध्ये घातल्याप्रमाणे साफ करून ‘क्लीन चीट’ दिली जाते, हे संपूर्ण देशानं पाहिलं आहे. याबाबतचा तपशीलही समोर आला आहे. मी कुठलेही वैयक्तिक आरोप करत नाही.” असेही सुळे यांनी म्हंटलं आहे.
ती घटना अयोग्य…
चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेल्या शाईफेकीबाबत बोलताना सुळे यांनी, “ज्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती. त्यामुळे आपण त्या प्रकरणावर पडदा टाकायला पाहिजे. पण काल पिंपरी चिंचवडमध्ये जी घटना घडली, ती अयोग्य होती. आपण अनेक पद्धतीने निषेध करू शकतो. पण कुणावरही अशी शाई फेकणं आयोग्य आहे. अशी कृती कुणीही करू नये, ही माझी विनंती आहे. हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे,” अशी भूमिका मांडली.