मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वेळेवर पगार न झाल्यानं त्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सूर्यवंशी यांची आत्महत्या ही दुर्देवी घटना असल्याचे ट्विट करत या घटनेला राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. तसेच शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार टीका देखील केली आहे.
सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे की, कवठेमहांकाळ येथे कार्यरत असणारे एस.टी. चालक भीमराव सूर्यवंशी यांनी वेळेवर पगार होत नसल्याच्या कारणावरुन आत्महत्या केली आहे. ही अतिशय दुःखद घटना आहे.
हे ही वाचा …. Sangli : वेळेत पगार न झाल्याने ST कर्मचाऱ्याने संपवले आयुष्य; मन सुन्न करणारी घटना
त्यांनी पुढे म्हटले आहे की, एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे भांडवल करुन सत्तेत बसलेल्या ED सरकार(शिंदे-फडणवीस) या कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार करण्यात देखील अपयशी ठरले आहे. या गरीब, कष्टाळू आणि संवेदनशील कर्मचाऱ्यांच्या भावनांचा या सरकारने अक्षरशः खेळ मांडला, हे अतिशय संतापजनक आहे. ईडी (ED) सरकारने कृपया एस.टी. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर आणि नियमित करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा,अशी विंनती देखील खासदार सुळे यांनी केली आहे.