सांगली : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ बस आगारात चालक पदावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. वेळेवर पगार न झाल्यानं त्या कर्मचाऱ्याने टोकाचं पाऊल उचललं असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
भीमराव सूर्यवंशी असं आत्महत्या केलेल्या एसटी कर्मचाऱ्याचं नाव आहे. ते कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण गावाचे रहिवाशी आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास त्यांचा मृतदेह राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत एसटी कर्मचाऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
न्यायालयाचा आदेश असूनही एसटी महामंडळाकडून वेळेवर पगार मिळत नसल्याने भीमराव सूर्यवंशी यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, अशी परिसरात चर्चा आहे. मात्र, या मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांनी मविआ सरकार असताना 2021 मध्ये महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी संप केला होता. त्यावेळचे एसटी अनियमित वेतन प्रकरण न्यायालयात आहे. संपावेळी त्यांच्या वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्रावर न्यायालयात मान्य केले होते. असं असताना देखील सध्या निम्मा फेब्रुवारी गेला तरी, अद्याप 88 हजार एसटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा जानेवारीचा पगार झालेला नाही.
Maharashtra : राज्यातील ‘या’ चार क्रीडा स्पर्धांसाठी मिळणार आता 75 लाखांचे अनुदान
मविआ सरकारप्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत. राज्यात कोणताही पक्ष सत्तेत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा तिढा कायम राहत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे कामगार संघटना पुन्हा एकदा आक्रमक झाल्या आहेत. संघटनांनी एसटी महामंडळाला पुन्हा एकदा न्यायालयात खेचण्याची तयारी केली आहे.