– बाळासाहेब वाबळे
काऱ्हाटी – एकीकडे मुसळधार पाऊस सुरू असताना बारामती तालुक्यातील जिरायती भाग अद्यापही कोरडाच आहे. सलग पाच वर्षे दुष्काळाशी सामना करत असलेल्या गावांना यंदाही पावसाने हुलकावणी दिली असून ऐन पावसाळ्यात या भागात टॅंकरच्या 22 खेपा सुरू आहे. तर यापरिसरातील जिवनवाहिनी असलेली कऱ्हा नदीवरील बंधारा पाच वर्षांपासून
खळखळला नसल्याने हा बंधारा आहे की, पडिक जमीन आहे, असा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
बारामती तालुक्यातील पश्चिम भागातील बहुतांशी गावांमध्ये दुष्काळ सदृश्य स्थिती कायमच आहे. सुपे, काऱ्हाटी, बाबुर्डी शेरेवाडी, जळगाव, देऊळगाव आदी परिसरातील शेतातील विहीर, बोरवेल, पाझर तलाव, ओढा, नाले कोरडेच असल्याने कित्येक गावांची अद्यापही टॅंकरवच मदार आहे. सुपे परिसरातील सर्व जनावरांच्या छावण्या चाराटंचाईमुळे सुरूच आहेत. याबाबत काऱ्हाटीचे उपसरपंच अशोक लोणकर म्हणाले की, श्रावण सुरू झाला असूनही तुरळक पावसाशिवाय परिसरात दमदार पाऊस कोसळलेला नाही. त्यामुळे भर पावसात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याने जिरायती भागाची भिस्त सध्या टॅंकरवरच अवलंबुन आहे.
बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात जोपर्यंत दरमदार पाऊस कोसळत नाही, तोपर्यंत शासनाने जियती भागात जनावरांच्या छावण्या व टॅंकर सुरूच ठेवावेत.
– बी. के. जाधव, सरपंच, काऱ्हाटी