कोपरगाव – गोदावरी नदी पात्रात दोन लाख 91 हजार क्युसेस वेगाने विसर्ग सोडण्यात आल्यानंतर कोपरगाव शहरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अशा वेळी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी तातडीने आपतकालीन यंत्रण सज्ज केली होती.
पुराचा जोर वाढल्यानंतर संजीवनी युवा प्रतिष्ठान, संजीवनी उद्योग समूह व कोल्हे कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने शहरासह गोदावरी नदीकाठच्या गावातील तसेच पुणतांबा परिसरातील रस्तापूर, शिंगवे, बोरबने वस्ती येथील सुमारे 11 हजार पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांना आवश्यक ती मदत केली. यावेळी आ. कोल्हे व बिपिन कोल्हे जातीने उपस्थित होते. या कोल्हे परिवाराने रविवारी संपूर्ण रात्र जागून काढली.
कोपरगाव शहरासह गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा आदेश देऊन त्यांना संजीवनी आपत्ती नियंत्रण कक्षाच्या सहकार्याने पाणी येण्यापूर्वीच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. याकामी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, राष्ट्रीय आपत्ती निवारण, कोपरगाव नगरपालिका कर्मचारी कोपरगाव शहरवासीय प्रत्येक सामाजिक संघटना व संजीवनी उद्योग समूह आदींचे सहकार्य केले. असे यावेळी बिपिन कोल्हे म्हणाले.
कोपरगाव शहरासह तालुक्यातील संवत्सर, कोकमठाण, जेऊर कुंभारी, जेऊर पाटोदा, कुंभारी, मोर्विस, वारी, मनाईवस्ती, औद्योगिक वसाहत, हिंगणी, कोपरगाव बेट, कचेश्वर, शुक्लेश्वर मंदिर, डाऊच बुद्रुक, खुर्द, माहेगाव देशमुख, मायगाव देवी, चांदगव्हाण, शिंगवे, पुणतांबा येथील पूरग्रस्तांना रविवारी रात्रीचे जेवण, सोमवार दोन वेळचे जेवण, पिण्याच्या पाण्याची व चहापान व्यवस्था थेट जागेवर संजीवनीचे यंत्रणेमार्फत करण्यात आली.
कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगाव येथे संजीवनीच्या वतीने आपत्कालीन कक्ष 24 तास उघडण्यात आला होता.आ. कोल्हे, बिपिन कोल्हे, विवेक कोल्हे रविवारी रात्रभर व सोमवारी पहाटेपासून या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. कोल्हे परिवाराच्यावतीने गोदाकाठच्या गावातील नागरिकांना धीर देऊन तातडीने मदत केली.