नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील वाढते धुके आणि जवेच्या प्रदूषणाचा सामना करत उत्तम कामगिरी नोंदवून यजमान भारताला देशाच्या राजधानीत नमवण्याचे मोठे आव्हान पहिल्या टी-20 सामन्यात पाहुण्या बांगला देशवर असेल. रविवारी फिरोजशहा कोटला मैदानावर होत असलेल्या या लढतीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) संघनिवड समितीचेही लक्ष असेल. कारण या सामन्यात दिग्गज खेळाडूंना विश्रांती देत भारत काही नव्या दमाच्या युवा खेळाडूंना संधी देणार आहे.
नुकत्याच संपलेल्या दिवाळीतील फटाक्यांच्या आतषबाजीने आधीच दिल्लीचे वातावरण धूर, धूळ आणि धुक्याने प्रदूषित झाले आहे. मात्र, जोरदार मागणी होऊनही बीसीसीआयने सामन्याचे ठिकाण बदलण्यास नकार दिल्याने उभय संघांना प्रदूषित हवेतच आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. भारताचे बहुतांश नामांकित खेळाडू या सामन्यात खेळणार नाहीतच; अशातच बांगलादेशचा हुकमी खेळाडू शाकीब अल हसनवर त्यांच्या क्रिकेट मंडळाने खेळण्यास बंदी घातल्याने पाहुण्यांच्या चिंतेत भरच पडली आहे. आगामी वर्षात ऑस्ट्रेलियामध्ये होणार असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेआधी किमान 20 लढती होणार असून, त्यामधून नव्या दमाचे खेळाडू शोधण्याची संधी भारताला आहे.
भारतीय संघात मुंबईचा अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे, त्याचा संघसहकारी शार्दूल ठाकूर आणि राजस्थानचा दीपक चहर यांच्यावर गोलंदाजीची मदार असणार आहे. फिरकी गोलंदाजीसह फलंदाजीत चमक दाखवणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरच्या कामगिरीकडेही लक्ष असणार आहे.
नियमित कर्णधार विराट कोहलीनेही विश्रांती घेणे पसंत केले असल्याने, त्याच्या जागी कर्णधारपद भूषवत असलेल्या आणि प्रचंड फॉर्मात असलेल्या तडाखेबाज रोहित शर्माच्या सलामीचे दडपणही पाहुण्यांवर असेलच. इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धा अंगठ्याच्या दुखापतीने अर्ध्यावर सोडून परतलेल्या शिखर धवनपुढे उत्तम कामगिरीचे दडपण असेल. त्याला अद्याप त्याचा फॉर्म गवसलेला नाही. त्यामुळे दमदार सलामीसाठी त्याला आपली उपयुक्तता सिद्ध करावी लागेल. दक्षिण आफिक्रेविरुद्धच्या मालिकेत 36 आणि 40 धावांच्या पुढे मजल मारु न शकलेल्या शिखरला विजय हजारे चषकाच्या सात सामन्यांत अवघे एकच अर्धशतक झळकावता आले आहे, हे विसरून चालणार नाही.
के. एल. राहुल, कृणाल पांड्या आणि श्रेयस अय्यर यांच्यासह यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतवर मोठी धावसंख्या रचण्याची जबाबदारी असेल. तसेच फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या शिवम दुबेला वरच्या क्रमांकावर फलंदाजीच्या संधीची प्रतीक्षा असेल. आशिया खंडातील भारताच्या वर्चस्वाला ठेच देणारा संघ म्हणून अनेकदा बांगलादेशने मोठी भूमिका बजावली आहे. श्रीलंकेच्या संघाची कामगिरी मालिकेगणिक खालावत गेल्यानंतर बांगलादेशने आपली प्रतिमा अधिक उजळ करत काही लक्षणीय विजय मिळवले आहेत. तरीही मुख्य खेळाडू शाकीब अल हसनवर बंदीच्या कारवाईने संघाने मनोधैर्य ढळल्याचे संकेत मिळत आहेत.
नवख्या अफगाणिस्तानने चितेगावच्या कसोटीत बांगलादेशवर विजय मिळवल्यानंतर मात्र बांगला देशने चार सामन्यांची टी-20 मालिका 3-1 ने जिंकली होती, हीच काय ती पाहुण्यांची सध्याची जमेची बाजू आहे. कर्णधार महमदुल्लाह रियादवर आता मोठी जबाबदारी असणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेची सुरुवात विजयाने करण्यासाठी पाहुणे प्रयत्नशील असतील. आता लिटन मुशफिकूर रहिम आणि सौम्या सरकारवर सामना जिंकण्याची जबाबदारी आहे.