शिराळा – वाढत चाललेली पेशवाई घालवून शेतकऱ्यांचे व कष्टकऱ्यांचे राज्य आणण्यासाठी पुरोगामी विचारांना, शरद पवारांना साथ करा, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मेटकरी यांनी केले.
कामेरी येथे मानसिंगराव नाईक यांच्या प्रचार सभेत बोलत होते. प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मानसिंगराव नाईक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे सरकार पुन्हा आणायचे असेल, तर शांत राहून चालणार नाही. आपणास परिवर्तन घडवावे लागेल. प्रत्येक कार्यकर्त्याने पेटून उठले पाहिजे. भाजपचे डाव ओळखा त्यांना महाराष्ट्र गिळंकृत करायचा आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी मानसिंगभाऊंना प्रचंड मताधिक्याने विजयी करून शेतकऱ्यांच्या, हक्कासाठी झटणाऱ्या नेतृत्वाला विधानसभेत पाठवा, असे आवाहन त्यांनी केले.