आंबोली येथील प्रचारसभेत अशोक खांडेभराड यांचे आवाहन
आंबोली- खेड तालुक्यातील गुंडगिरीची परंपरा गेली पाच वर्षे खंडित झाली आहे. पण आता ती पुन्हा डोकेवर काढू पाहत आहे. खेड तालुक्यातील राजकीय दहशतवाद आणि गुन्हेगारी कायमची गाडून टाकण्यासाठी महायुतीचे उमेदवार सुरेश गोरे यांना विजयी करा, असे आवाहन शिवसेनेचे नेते अशोक खांडेभराड यांनी केले.
खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार आमदार सुरेश गोरे यांची प्रचारसभा सभा आंबोली (ता. खेड) येथे रविवरी (दि.13) झाली, त्यावेळी खांडेभराड बोलत होते. यावेळी महायुतीचे उमेदवार आमदार सुरेश गोरे, पुणे जिल्हा विजया शिंदे, माजी तालुका प्रमुख शिवाजी शिंदे, जिल्हा परिषद सदस्या तनुजा घनवट, भाजपा नेते सूर्यकांत मुंगसे, सरपच संभाजी कुडेकर, युवा तालुका प्रमुख व पं.स.सदस्य अंकुश राक्षे, ऊपतालुका प्रमुख सुभाष मांडेकर, गोरख बच्चे, महादेव लिंभोरे, अंकुश डांगले, मच्छिन्द्र सातकर, रघुनाथ शिंदे, रोहन शिंदे, सोमनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, आदित्य खंडागळे, जिजाराम मेटल, तुकाराम सावंत, ऊमेश गिरे, विश्वास सावंत, दिनेश शिंदे, संतोष सावंत यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व पश्चिम पट्यातिल नागरिक मोठ्या संख्येने सभेला उपस्थित होते.
अशोक खांडेभराड म्हणाले की, आज वेगवेळ्या पक्षाचे झेंडे महायुतीच्या निमित्ताने एकत्र आहेत. कारण महायुतीचा कार्यकर्ता मनापासून काम करीत आहे. पण काहींनी आपल्या घरातच झेंड्याचे दुकान थाटले आहे. त्यांच्याकडे कोणताही ठोस विचार किंवा कृती कार्यक्रम नाही. काहींना लिहिता वाचता येण्याची भ्रांत आहे. त्यांना फक्त तालुक्यातील गोरगरीब माणसाच्या वडिलोपार्जित जागेचा सातबारा वाचता येतो. त्यांना आता तालुक्यातील सत्ता साम-दाम-दंड-भेद वापरून हातात घेण्याची प्रबळ इच्छा झाली आहे. गुन्हेगारी आणि एजंटांचा तालुका अशी ओळख निर्माण करून द्यायची नसेल तर त्यांना वेळीच रोखण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. खेड-आळंदी मतदारसंघाला ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय अशी वैभवशाली मोठी परंपरा आहे. ती मध्यंतरी दहा वर्षांत खंडित झाली होती. ही परंपरा गोरे यांनी पुन्हा सुरू केली आहे. ती कायम राखण्यासाठी गोरे यांना मताधिक्य द्या, असे आवाहन त्यांनी केले.
- खेड तालुक्यातील राजकीय दहशतवाद आणि गुन्हेगारी कायमची गाडून टाकण्यासाठी जनतेनेच योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. तुम्हाला “भाऊ पाहिजे का भाई’ पाहिजे? पश्चिम विभागाला कायम न्याय द्यायचे काम केले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागाचा कायमस्वरूपी कायापालट होईल असा कर्जत-भीमाशंकर रस्ता मंजुर केला. यामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम विभागाच्या स्थितीमध्ये आमुलाग्र बदल होणार आहे. या भागातील अनेक रस्ते मंजुर केले. पश्चिम विभागातील आदिवासी समाजाच्या कायम पाठीशी आहे. य भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
– सुरेश गोरे, आमदार