नवी दिल्ली – तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार विजय अर्थात थलपती विजयही राजकारणात एन्ट्री घेणार असून राजकीय पक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नव्या पक्षाच्या अध्यक्षपदी विजय यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पक्षाची निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, पक्षनोंदणीच्या अगोदर जी बैठक घेण्यात आली होती, त्याला पक्षाच्या जनरल काउन्सिलचे २०० सदस्य उपस्थित होते. केंद्रीय कार्यकारिणीची रचना करण्यात आली असून पक्षाच्या सरचिटणीसांची आणि खजिनदारांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे नाव आणि निवडणुकीच्या संदर्भात अन्य बाबी ठरवण्याचे अधिकार कार्यकारिणीने अध्यक्ष विजय यांना बहाल केले आहेत. तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या अगोदर म्हणजे २०२६ मध्ये ते राजकारणात सक्रिय होतील असा अंदाज वर्तवला जात आहे. पक्षाचे नाव काय असेल हे जरी आता सांगता येत नसले तरी तमिळनाडूची परंपरा लक्षात घेता त्या कळघम या शब्दाचा समावेश मात्र नक्की असेल असे स्पष्ट करण्यात आले.
विजय यांना तमिळ चित्रपटसृष्टीचा नवा रजनीकांत मानले जाते. रजनीकांत यांच्याएवढीच किंवा त्यांच्यानंतर त्यांचीच सगळ्यांत जास्त राज्यात लोकप्रियता असून त्यांनी आतापर्यंत ६८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. गेल्या किमान एक दशकापासून ते राजकारणात प्रवेश करण्याच्या शक्यतेची चाचपणी करत होते असेही मानले जाते.
विजय यांचे असंख्य फॅन क्लब तमिळनाडूत अस्तीत्वात असून त्याच्या मार्फत गरिबांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्यात अन्नधान्य वाटप, शिष्यवृत्ती, ग्रंथालय, सायंकाळचे वर्ग आणि कायदेशीर मदत आदींचा समावेश आहे.अलिकडेच त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश संपादन केलेल्या उमेदवारांच्या सन्मानासाठी मतदारसंघ निहाय कार्यक्रमांचे आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबडेकर, पेरियार, कामराज यांच्याबद्दल वाचन करा. त्यातले चांगले ते घ्या आणि बाकीचे सोडून द्या असा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला होता.
विजय यांचे वडिल चंद्रशेखर हे तमिळ चित्रपटसृष्टीतील प्रख्यात दिग्दर्शक आहेत. विजय यांची केवळ राज्यातच नव्हे तर राज्याबाहेरही प्रचंड लोकप्रियता असून त्यांच्या विविध चित्रपटांत अत्यंत संवेदनशील मुद्द्यांना आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या विषयांचा हात घातलेला असतो. सरकारला लक्ष्य करण्यासाठी काही वेळा त्यांच्या चित्रपटांनी अत्यंत वादग्रस्त भूमिका घेतली असल्याचेही आढळून आले आहे.