नवी दिल्ली – तामीळनाडूचे राज्यपाल आर.एन.रवी यांनी गुरूवारी त्या राज्याचे मंत्री व्ही.सेंथिल बालाजी यांना तडकाफडकी बडतर्फ केले. बालाजी सध्या तुरूंगात आहेत. मंत्र्याला मंत्रिमंडळातून हटवण्याच्या राज्यपालांच्या दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या कृतीमुळे राजकीय वादळ घोंघावण्याची चिन्हे आहेत.
काही दिवसांपूर्वी बालाजी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यांच्यावर नोकऱ्यांच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आणि मनी लॉण्डरिंग केल्याचा आरोप आहे. अटकेनंतर बालाजी यांच्याकडील खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांनी इतर मंत्र्यांकडे सोपवली. मात्र, बालाजी यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून मंत्रिमंडळात कायम ठेवले.
आता त्यांना राज्यपालांनी मंत्रिमंडळातून डच्चू दिला आहे. त्याविषयीचे निवेदन राजभवनने जारी केले. बालाजी यांच्याविरोधात भ्रष्टाचाराबद्दल फौजदारी स्वरूपाची गंभीर कारवाई सुरू आहे. ते मंत्रिपदावर राहिल्याने तपासावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे राज्यपालांकडून त्यांना तातडीने बडतर्फ केले जात आहे, असे त्या निवेदनात नमूद करण्यात आले.
मंत्रिपदी वर्णी लावणे आणि मंत्रिपदावरून हटवणे हे मुख्यमंत्र्यांचे विशेषाधिकार मानले जातात. त्यामुळे बालाजी यांच्या बडतर्फीनंतर स्टॅलिन यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. राज्यपालांना मंत्र्याला बडतर्फ करण्याचा अधिकार नसल्याचे त्यांनी म्हटले. तसेच, न्यायालयीन लढ्याचे सूतोवाच केले. द्रमुकच्या नेतृत्वाखालील तामीळनाडू सरकार आणि राज्यपालांमध्ये आधीपासूनच विविध मुद्द्यांवरून संघर्ष सुरू आहे. नव्या घडामोडीमुळे तो आणखीच वाढण्याची शक्यता आहे.