पुणे, दि. 14 – भारत इलेक्ट्रॉनिक्सकडून इलक्ट्रिक वाहनांना वेगाने चार्जिंग करणारी यंत्रणा विकसित केली आहे. त्याची चाचणी सुरू आहे. येत्या काळात देशातील महत्वाच्या पाच महामार्गावर ही सुपर चार्जर बसविण्यात येणार आहेत, अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेशकुमार बत्रा यांनी सांगितले.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडकडून (बीईएल) वेगवेगळ्या शहरांत सुरू असलेल्या कामाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बत्रा बोलत होते. बत्रा म्हणाले, “कंपनी रडार, क्षेपणास्त्र प्रणाली, मिलिटरी कम्युनिकेशन्स, नेव्हल सिस्टीम, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि एव्हियोनिक्स, इलेक्ट्रो ऑप्टिक्स, टॅंक इलेक्ट्रॉनिक्स आणि वेपन सिस्टम अपग्रेड अशा वेगवेगळ्या पातळीवर काम करत आहेत. करोनाच्या काळात कंपनीने 30 हजार व्हेंटिलेटर उत्पादन विक्रमी वेळेत केले. करोनाचा मुकाबला करण्यासाठी त्याचा खूप फायदा झाला. बीईएल काही क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करत आहे. त्यामध्ये नागरी विमान वाहतूक क्षेत्र, अँटी ड्रोन प्रणाली, मानवरहित प्रणाली, सॅटेलाइट असेंब्ली आणि इंटिग्रेशन, सोलर बिझनेस, रेल्वे आणि मेट्रो सोल्यूशन्स, नेटवर्क आणि सायबर सुरक्षा, ऊर्जा यांचा समावेश आहे.
लिथियम आयन बॅटरीवर पुण्यात संशोधन
इलक्ट्रिक वाहनांसाठी लागणारी लिथियम आयन बॅटरी आणि इंधन सेल, तसेच जलद चार्जिंग स्टेशन याच्यावर देखील काम केले जात आहे. यामध्ये देखील मोठी गुंतवणूक केली जात असून त्याचे पुण्यात काम सुरू आहे. तसेच, त्याच्यावर संशोधन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.