नवी दिल्ली – भारताचे माजी फिरकी गोलंदाज सुनील जोशी यांनी भारताच्या वरिष्ठ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला आहे. फिरकी गोलंदाजी हे भारताचे प्रभावी अस्त्र असून संघास त्यासाठी योग्य प्रशिक्षकाची गरज आहे. या दृष्टीनेच आपण अर्ज केला आहे, असे त्यांनी सांगितले.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून फिरकी गोलंदाज अनिल कुंबळे यांनी काम केले होते. 2017 च्या चॅम्पियन्स स्पर्धेतील अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर कोहलीबरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा त्याग करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघाला फिरकी गोलंदाजीबाबत विशेष मार्गदर्शन करणारा मिळालेला नाही. ही जागा भरून काढण्यासाठीच मी इच्छुक आहे. मी बांगलादेश संघाबरोबर फिरकी गोलंदाजीचे प्रशिक्षक म्हणून अडीच वर्षे काम केले आहे. या कालावधीत त्यांच्याकडे अनेक चांगले फिरकी गोलंदाज तयार झाले आहेत.
जोशी यांनी 1996 ते 2001 मध्ये भारताकडून 15 कसोटींमध्ये 41 विकेट्स घेतल्या आहेत. एक दिवसाच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्यांनी 69 गडी बाद केले आहेत.