एखाद्याला सहज विचारले की, तुला कोणते संगीत आवडते, तर तो लगेचच एखाद्या चित्रपटाचे गाणे म्हणून दाखवेल. एवढे हिंदी चित्रपट संगीत लोकप्रिय आहे.
वास्तविक आपल्या देशात शास्त्रीय संगीताला खूपच मोठे स्थान आहे. संगीत घराणे आणि संगीतकारांची मोठी परंपरा लाभली आहे. शास्त्रीय रागांचा हिंदी चित्रपट गीतांशी थेट संबंध नसतो; परंतु या गीतात शास्त्रीय संगीत दडलेले असते. एका अर्थाने हिंदी चित्रपट संगीत हे शास्त्रीय संगीताचाच एक भाग आहेत. हिंदी संगीताने शास्त्रीयतेचे बंधन काढून गीत सोपे करण्याचे काम केले आहे. शास्त्रीय संगीत हे पूर्वी राजदरबारातील वैभव असायचे. परंतु हिंदी चित्रपट संगीताचा बोलबाला वाढल्यानंतर शास्त्रीय संगीतावर मर्यादा आल्या, मात्र लोकप्रियतेत घट झाली नाही. असे असतानाही अभिजात चित्रपटातील गाणे हे शास्त्रीय संगीतावरच रचले गेले, हे विशेष.
हिंदी चित्रपटात शास्त्रीय संगीताची परंपरा पाळली जात नाही. हे एकप्रकारे मुक्त संगीत आहे. यात शास्त्रीय संगीताची शैली आणि नाद सोयीने वापरला जातो. अशीच स्थिती शास्त्रीय वाद्यांची आहे. अनेक चित्रपट संगीतात तबल्याचा, सतारचा वापर केला गेला आहे. तबला तर उत्तर भारतीय वाद्य आहे. कर्नाटक संगीतात पखवाजचा उपयोग केला जातो. आता तर शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीत यांचे फ्यूजन करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. शास्त्रीय संगीताशी निगडीत गीत आजही लोकप्रिय आहेत.
मोरा पिया मोसे बोलत नाही (राजनीती), अलबेला सजन आयो रे (हम दिल दे चुके सनम), आओगे जब तुम साजना (जब वुई मेट), ओरे पिया (आजा नच ले) सारखे गीत हे शास्त्रीय संगीताचीच देणगी आहेत. चित्रपटाच्या नामांकित संगीतकारांनी देखील कोणत्या ना कोणत्या गुरूंकडून शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले आहेत. एस. डी. बर्मन, मदन मोहन, लक्ष्मीकांत प्यारेलाल, कल्याणजी आनंदजी यांचे मूळ शिक्षण शास्त्रीय संगीतातच झाले आहे. संगीत विद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर ते नामांकित संगीतकार म्हणून विख्यात झाले. लखनौच्या मॅरिस म्युझिक कॉलेजमधून बाहेर पडलेल्या निष्णात संगीतकारांनी अनेक चित्रपटांना संगीत दिले आहे. त्यात सरस्वती देवी, मदनमोहन यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
“बैजू बावरा’चे संगीतकार नौशाद यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत शास्त्रीय संगीत आणले. 1952 मध्ये “बैजू बावरा’ चित्रपट सुपरहिट ठरला आणि याचे श्रेय शास्त्रीय संगीतालाच गेले. नौशाद यांनी अनमोल, शहाजहॉं, मदर इंडिया यासारख्या चित्रपटांना संगीत दिले आणि त्यांचे नाव घराघरात पोचले. बैजू बावराचे गीतकार शकील बदायूनी यांना नौशाद यांनीच आणले होते. मात्र त्यांना या चित्रपटासाठी उर्दू सोडावी लागली आणि हिंदीत गीत लिहावे लागले. गीताबरोबरच भजन “मन तडपत हरि दर्शन को आज’ हे देखील संगीतबद्ध केले.
नौशाद यांनी “बैजू बावरा’साठी डी. व्ही. पळुसकर आणि उस्ताद अमीर खॉं यांच्या आवाजाचा वापर केला. नौशाद यांनी शास्त्रीय संगीताचा कौशल्याने वापर करत गीतांची रचना केली. 1972 मध्ये “पाकिजा’चे संगीतकार गुलाम मोहंमद यांच्या निधनानंतर नौशाद यांनी या चित्रपटाचे संगीत पूर्ण केले. अंदाज, दुलारी यासारख्या चित्रपटांच्या माध्यमातून लता मंगेशकर यांचे करियर बहरले. नौशाद यांनी चित्रपटात बासुरी, सतार, सारंगीचा प्रथमच वापर केला.
मूक चित्रपटांना आवाजाची देणगी लाभल्यानंतर संगीताची परंपरा सुरू झाली. त्याचा परिणाम म्हणजे हिंदी चित्रपटांची लोकप्रियता पाहून शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गजांनी हिंदी चित्रपटात योगदान दिले. प्रख्यात बासुरी वादक पन्नालाल घोष हे करियरच्या सुरुवातीच्या काळात हिंदी चित्रपटाशी जोडले गेले. 1957 मध्ये “वसंत बहार’ मध्ये लता मंगेशकर यांचे “मैं पिया तेरी तू माने, दुनिया जाने तू जाने या न जाने’ या गीतात बासुरीचा वापर केला. त्यासाठी पन्नालाल घोष यांना दिल्लीहून मुंबईला आणले होते. त्यांच्या बासुरीने या गाण्याला अमरत्व मिळाले. सरस्वती देवी यांची संगीतकार होण्याची कहाणी देखील वेगळी नाही.
हिमांशू रॉय यांच्या सांगण्यावरून त्यांनी हिंदी चित्रपटाला संगीत दिले. त्या शास्त्रीय गायनात माहिर होत्या. पण त्यांना प्रसिद्धी मिळाली ती पहिली महिला संगीतकार म्हणून. अछूत कन्या आणि जीवन नैया या चित्रपटाला सरस्वती देवी यांनी संगीत दिले आणि इतिहास घडला. “गूंज उठी शहनाई’चे गीत “तकदीर का फसाना जाकर किसे सुनाए’ मध्ये उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांनी वाजवलेल्या सनईचे स्वर आजही कानसेनांच्या मनात घोळत आहेत.
उस्ताद अल्ला रखा खॉं यांनी 1950 च्या दशकांत सुमारे 20 चित्रपटांना संगीत दिले. यात सबक आणि बेवफा चित्रपटाची अधिक चर्चा झाली. सरोदवादक उस्ताद अली अकबर खॉं यांनी 1952 मध्ये आँधिया चित्रपटाला संगीत दिले. सतारवादक पंडित रविशंकर यांनी “धरती का लाल’मध्ये पहिल्यांदा संगीत दिले. चेतन आनंद यांचा चित्रपट “नीचा नगर’ ला रविशंकर यांचेच संगीत होते. 1960 मध्ये ऋषिकेश मुखर्जी यांचा अनुराधा आणि गोदान चित्रपटाला रविशंकर यांनी संगीत दिले. बासुरीवादक हरिप्रसाद चौरासिया आणि संतुरवादक शिवकुमार शर्मा यांची शिव-हरी नावाच्या जोडीने हिंदी चित्रपटाला एकाहून एक सरस गीत दिले आहेत. 1982 मध्ये यश चोप्रा यांच्या “सिलसिला’ चित्रपटाला या जोडीने पहिल्यांदा संगीत दिले. त्यानंतर याच बॅनरखाली डर, लम्हे, चांदणी यासारख्या चित्रपटांना संगीत दिले.
राग आणि हिंदी चित्रपट गीत
राग आणि हिंदी चित्रपट संगीत यांचा जवळचा संबंध आहे. यात राग बिहाग, राग भैरवी, भीमपलासी, राग भूपाळी, राग दरबारी कानडा, राग देस, राग जयजयवंती, राग जौनपुरी, राग काफी, राग केदार याचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. या रागावर आधारलेले गीत लोकप्रिय ठरले आहेत. राग यमनवर आधारित हिंदी गाण्यांची संख्या लक्षणीय आहे. चित्रपटात बहुतांशवेळा यमन कल्याण रागाचा वापर केलेला दिसून येतो. गाणे जुने असो किंवा नवीन असो यमन कल्याण रागाचा वापर हा प्रत्येक कालखंडात झाला आहे. मराठी चित्रपटात देखील शास्त्रीय संगीताचा वापर झालेला दिसून येतो. “कट्यार काळजात घुसली’ (2016) या चित्रपटाचे उदाहरण घेता येईल. याशिवाय अष्टविनायक (1979) चित्रपटाचा देखील उल्लेख करता येईल.
सोनम परब