यावर्षी म्हणजे 2023 मध्ये 18 जुलै ते 16 ऑगस्ट हा कालावधी अधिक महिना आहे. अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या नामकरणाविषयी अनेक रोचक कथा, रूपकं आपल्याला आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये सापडतात.
अधिक महिना दर तीन वर्षांनी येतो. ज्यावर्षी अधिक मास येतो तेव्हा मराठी वर्षाचे महिने बारा न राहता तेरा असतात. यापूर्वीचा अधिक मास 2020 मध्ये आलेला होता. अधिक महिन्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या नामकरणाविषयी अनेक रोचक कथा, रूपकं आपल्याला आपल्या पौराणिक ग्रंथांमध्ये सापडतात. दरवर्षी आपल्या चालू महिन्यातल्या दहा तिथ्या घटतात. म्हणजेच बऱ्याचवेळा एकाच दिवशी दोन दोन तिथ्या येतात. अशा या घटणाऱ्या तिथ्यांचा 3 वर्षांत दहा याप्रमाणे तीस दिवसांचा एक महिनाच तयार होतो. म्हणूनच दर तीन वर्षांनी येणाऱ्या या महिन्याला अधिक मास असे म्हणतात.
यावर्षीचा अधिकमास श्रावण महिन्यात आला आहे. सुमारे 29 वर्षांनी हा योग जुळून आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत जेव्हा जातो तेव्हा त्या प्रक्रियेला संक्रांत म्हणतात. जवळपास प्रत्येक महिन्यात सूर्याचे राश्यांतर होत असते. मात्र, पौराणिक कथेनुसार सूर्य ज्या महिन्यात रास बदलत नाही म्हणजे संक्रमण करीत नाही तो महिना मलमास मानला जातो. प्रत्येक महिना हा कोणा ना कोणाच्या अधिपत्याखाली असतो.
म्हणजे प्रत्येक महिन्याला त्याचा स्वामी असतो. मात्र, मलमासाला (मलीनमास) कोणीच स्वामी नाही. अशा या दु:खी एकाकी मलमासाने भगवान श्री विष्णूंची आराधना केली. त्यावर प्रसन्न होत भगवान विष्णूंनी त्याला आपल्या छत्रछायेखाली घेतले. एवढेच नव्हे तर आपले नावही दिले. तेव्हापासून या मलमासाचे नाव पुरुषोत्तम मास असे झाले. या मासाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद लाभला आणि तो पवित्र, पावन झाला.
या महिन्याला “धोंड्याचा महिना’ असेही म्हणतात. अधिक मास सर्वदूर येत नाही. सूर्यावर आधारित पंचांग पाळणाऱ्या किंवा मानणाऱ्या राज्यात, जसे आसाम, केरळ, ओडिशा, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या प्रांतांत तो मानला जात नाही. तो फक्त महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि मध्य प्रदेश याच राज्यांत हा महिना मानला जातो. कारण, याठिकाणी चांद्रपंचांग वापरल्या जाते.
पृथ्वीवर होणारे ऋतूंचे बदल सूर्यामुळे होत असतात. त्यामुळे सौर कालगणना महत्त्वाची ठरते. पण सूर्याच्या स्थानबदलाने होणारे बदल सहजा सहजी लक्षात येत नाही. दैनंदिन जीवनचर्या ठरवताना चंद्र उपयोगी ठरतो. हे लक्षात घेऊन दैनिक व्यवहाराकरिता चांद्र तर वार्षिक व्यवहाराकरिता सौर कॅलेंडर वापरले जाते. हा झाला खगोलशास्त्रीय विचार. पौराणिक आणि धार्मिकदृष्ट्या तो फार महत्त्वाचा मानला जातो. साधारणतः अधिकमास चैत्र ते अश्विन महिन्यात येतो. क्वचित कधी तरी कार्तिक आणि फाल्गुन अधिक येतो. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे महिने कधीच अधिक महिना येत नाहीत.
यावर्षी अधिक महिना श्रावणात येत आहे. त्यामुळे श्रावण हा 60 दिवसांचा आहे. साहजिकच, श्रावणी सोमवार आठ मानले जातील. अधिक मासात खूप मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जातो. भगवान विष्णूची पूजा केली जाते. श्रावण महिना देवाधिदेव महादेवांचा प्रिय महिना असल्याने या महिन्यात शंकराची पूजाअर्चा, ध्यानसेवा यांनाही महत्त्व आहे. अधिक महिन्यात अनारसे, तांबुल दानाचे महत्त्व जास्त आहे. यावर्षी चातुर्मास हा पाच महिन्यांचा राहील. या काळात सच्छिद्र वस्तूंचे दान महत्त्वाचे ठरते. जावयाला 30 आणि 3 अनारसे देण्याला अधिकाचे वाण म्हणतात. या वाणामुळे भरपूर पुण्य लाभते, असे मानले जाते.
या महिन्यात दान करताना अनारसे का वापरला जाते आणि ते 33 का, असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागे एक सुंदर रूपककथा आहे. तीस अनारसे म्हणजे अधिक मासातील तीस दिवसांचे. प्रत्येकी एक याप्रमाणे वरचे तीनपैकी एकतिसाव्या अनारशामागे मुलीकडे जेवणाचा दोष जाणे हे कारण आहे.
पूर्वी लेकीच्या सासरी मुलीचे आईवडील जेवण करीत नसत. जर काही कारणाने जेवावे लागले तर तो दोष लागतो, असे मानले जायचे. त्या दोषाचे निवारण करण्याची जबाबदारी एकतिसाव्या अनारस्याची असते. बत्तीसावा अनारसा आपल्या गुरूच्या घरी किंवा ब्राह्मणाकडे जेवावे लागले तर तो दोष निवारणासाठी असतो. उरलेला तेहतिसावा अनारसा ज्या घरी सुतक आहे किंवा सोयर-वृद्धी आहे अशा घरी नाईलाजाने जेवावे लागले तर तो दोष निवारणासाठी असतो. अशाप्रकारे अधिक मासात जावयाला किंवा ब्राह्मणाला तेहतीस अनारशांचे वाण दिले जाते.
यामागील एक मान्यता अशी की, अनारसे सच्छिद्र असतात. त्याला बारीक बारीक जाळी असते. या जाळीची जी छोटी छोटी छिद्रे असतात ते जणू नरकयातनांचे रूपक आहे. आपण जेव्हा हे वाण किंवा दान देतो. तेव्हा आपल्या पूर्वजांना अनेक नरकयातनांतून सुटका, मुक्ती मिळते. म्हणून हे वाण किंवा दान महत्त्वाचे ठरते.
अधिक मासाला धोंड्याचा महिना मानण्याची प्रथा शक्यतो मराठवाड्यात पाळली जाते. याही ठिकाणी जावईच महत्त्वाचा असतो. पुरणाचे दिंडं करून त्याचे वाण जावयाला दिले जाते. या दिंडांना धोंडा असं म्हणतात. जावई किंवा भाचा म्हणजे नणंदेचा मुलगा. बऱ्याच ठिकाणी आतेघरी सून म्हणून भावाची मुलगी करतात. म्हणूनच भाचा हा जावई होतो. आपल्याकडे जावई आणि मुलीला लक्ष्मीनारायण म्हणून पूजनाचा मान आहे. अधिक महिना हा भगवान विष्णूचा लाडका पुरुषोत्तम मास आहे. म्हणून या अधिक महिन्यात विष्णूची पूजा केली जाते. त्याअनुषंगाने जावयालाच विष्णुरूप समजून वाण दिले जाते.
आपला धर्म सहिष्णू आणि सर्वसमावेशक आहे. कोणाला दुखवू नये या मताचा आहे. म्हणूनच मलमासाला सर्वांनी झिडकारल्यावर भगवान विष्णूंनी त्याला आपले नाव देऊन पावन केले. या महिन्यात आपले नित्यकर्म करावे. विष्णूचे नामस्मरण करावे, असे शास्त्रात सांगितले आहे. या महिन्यात विवाह, मौजीबंधन, घरभरणी, वास्तुशांती अशी पवित्र कार्ये करू नयेत. फक्त स्वत:च्या उन्नतीचा (धार्मिक, अध्यात्मिक) प्रयत्न करावा. खरे तर हे नीतिनियम आपल्यासाठी प्रगतीचे मार्ग सुकर व्हावे म्हणूनच योजिलेले आहेत.
गौरी सरनाईक