मुंबई : १ जानेवारी २०१८ साली झालेल्या भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी मनसे सह विविध पक्षांच्या सहा मोठ्या नेत्यांना समन्स बजावण्यात आल्याची माहिती आहे. भीमा कोरेगाव दंगली प्रकरणी भीमा कोरेगाव चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाकडून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सहीत विविध पक्षाच्या सहा मोठ्या नेत्यांना समन्स बजावण्यात आले आहेत .
येत्या ३० जूनपर्यंत त्यांना याचे उत्तर द्यावे लागणार आहे. संबंधित प्रतिज्ञापत्र दाखल केल्यानंतर आयोगासमोर त्यांना आपली बाजू मांडावी लागणार आहे. या आयोगाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्य न्यामूर्ती जय नारायण पटेल हे आहेत तर मुख्य माहिती आयुक्त आणि सदस्य सुमित मलिक आहेत. याप्रकरणी वकील ऍड. आशिष सातपुते यांनी काँग्रेस ,भाजप , मनसे ,शिवसेना , रिपाइं ,वंचित बहुजन आघाडी या पक्षांना समन्स बजावले आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आयोगासमोर साक्ष दिली होती. मात्र यांच्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही नेत्याने अद्याप प्रतिसाद दिला नाही.
काय आहे अर्जात ?
या घटनेच्या वेळी पक्षांच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती नव्हती मात्र अशा घटना घडल्यानंतर जिल्हा तसेच पोलीस प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जावीत ? पोलीस प्रशासनाला आणखी कोणत्या यंत्रणांची गरज आहे ? दैनंदिन जिवनावर परिणाम न होता आंदोलने होण्याच्या दृष्टीने काय हालचाली आवश्यक आहेत ? अशा प्रकारच्या सुचना नेत्यांकडून मिळणे आवश्यक आहेत. त्यावरून राज्य सरकारला योग्य त्या शिफारसी करता येतील असे आयोगासमोरील अर्जात म्हंटले आहे.